प्रवासाची तारीख : ६ नोव्हेंबर २०२२
वाहतुकीची पद्धत: ट्रेन आणि बस
किल्ल्याचा इतिहास
गुमतारा हा किल्ला शिलाहारांच्या काळापासून अस्तित्वात असावा. पुढे मराठा राजवटीत शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नूतनीकरण केले. २४ मार्च १७३७ रोजी वसईच्या मोहिमेदरम्यान माहुली किल्ला सोडल्यानंतर पेशव्यांनी गुमताराच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात विश्रांती घेतली, परंतु पाण्याच्या अभावामुळे ते जास्त काळ टिकू शकले नाहीत आणि त्यामुळे ३ ते ४ सैनिक मरण पावले.
सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे
- वसई आणि विरार हे जवळचे रेल्वे स्थानक आहेत - मुंबई लोकल वेस्टर्न लाईन.
- विरार गाडीत चढून वसईला उतरा.
- तुम्ही उसगाव धरणावरून ट्रेक करण्याचे ठरवले असल्यास वसई पश्चिम आगारातून जवाहर किंवा वज्रेश्वरी बस घ्या आणि उसगाव धर स्टॉपवर उतरा.
- जर तुम्ही दुगड - मोहिली गावातून ट्रेक करायचे ठरवले असेल तर जवाहर बस घ्या आणि अंबाडी येथे उतरा.
- वेळ वाचवण्यासाठी तुम्ही वसई आणि विरार येथून थेट ऑटो रिक्षा भाड्याने घेऊ शकता, परंतु ते जास्त शुल्क आकारतील.
👉 खर्चाचा व वेळेचा तपशील पहा
प्रवास आणि ट्रेकचा अनुभव
हृदयस्पर्शी इतिहास व कमी प्रचलित असलेला हा किल्ला सर करण्याचे नियोजीले. आम्ही किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गांची माहिती गोळा करायला सुरवात केली, प्राथमिक माहिती नुसार अंबाडी, दुगड मार्गे मोहिली गावातून जाता येते तर, दुसरा मार्ग उसगाव धरणाच्या मागून जातो, पण यूट्यूब वर मात्र दुगड - मोहाली मार्गे जाणारेच व्हिडिओच दिसत होते, उसगाव मार्गाचा एकही व्हिडीओ यूट्यूब वर उपलब्ध नाही. म्हणून आम्ही दुगड मार्गे जाण्याचे ठरविले, पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते ते आपल्याला पुढे कळेलच. मी आणि इतर दोन सदस्यांनी (शैलेश सावंत, आणि विलास काका) असे तिघे सकाळी ७:१२ ला गोरेगाव स्टेशनवरून विरार लोकलमध्ये बसून आमचा प्रवास सुरू केला. सकाळी ७:५५ च्या सुमारास आम्ही वसई स्थानकावर उतरून पश्चिमेकडे निघालो आणि MSRTC वसई बस डेपोत पोहोचलो. आम्ही बसच्या वेळेची चौकशी केली; जवाहरची बस सकाळी 8:30 वाजता येणार होती, पण नेहमीप्रमाणेच MSRTC ची बस उशीर आली, अंदाजी ८:५५ च्या दरमण्या आम्ही बस मध्ये चढलो आणि अंबाडी गावाच्या दिशेने निघालो, नियोजना प्रमाणे आम्ही अंबाडी ची तिकीट काढली, पण बस ला झालेला उशीर तसेच बस बरेच गाव फिरून अंबाडी ला जाणार होती, म्हणजे अजून एक ते दीड तास लागणार होता यामुळे आम्ही उसगाव धर ला उतरायचे ठरविले. सकाळी १०:३० च्या सुमारास उसगाव धर बस थांब्याला उतरलो, शेजारच्या स्टॉलवर नाश्ता केला आणि वज्रेश्वरी रस्ता ओलांडत उसगाव धरणाकडे चालायला लागलो.
टीप: वसई MSRTC बस डेपोपासून उसगाव धर ३३ किमी आहे आणि पोहोचण्यासाठी १ तास लागतो. उसगाव धर बस थांबा हा वज्रेश्वरी मंदिराच्या थांब्यापूर्वीचा चौथा थांबा आहे. दुपारच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी या परिसरात योग्य रेस्टॉरंट्स किंवा ढाबा उपलब्ध नाही; म्हणून, आपल्यासोबत पुरेसे अन्न आणि पाणी घेऊन जाणे. तज्ञाशिवाय उसगाव धरण ट्रेकचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न करू नये कारण, जंगल घनदाट आहे आणि त्यात वाट चुकण्याची दाट शक्यता आहे.
उसगाव गावातून गुमतार्याला जायला वाट असली तरी सहसा या वाटेने कोण्ही जात नाही, दुगड ला पोहचायला उशीर झाल्या कारणाने तसेच भर दुपारी डोंगर चढताना उन्हाच्या झळा लागतील म्हणून, उसगावच्या जंगलातून जाण्याचे ठरविले. आम्ही उसगाव धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर किमान १ किलोमीटर पायपीट केल्यानंतर, गावदेवी मंदिरासमोर पोहचलो. मंदिराच्या बाहेरूनच देवीचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. या मार्गावरून गुमतारा पर्वत स्पष्ट दिसत होता. उसगाव धरणाच्या मार्गाने चालत असताना, आम्हाला काही गावकरी भाताच्या पेंद्या झोडपताना दिसल्या, शहरात हे सर्व पाहायला कुठे मिळते हो, म्हणून थोडा वेळ पाहत उभे राहिलो आणि पुन्हा धरणाच्या दिशेने निघालो. पुढे जाऊन आम्ही डावे वळण घेतले आणि धरणा पाशी पोहचलो, गावातील काही स्त्रिया धरणाच्या पाण्यात कपडे धुवत होते. आम्ही उजवीकडे कडे वळलो आणि सरळ चालत धरणाच्या भीती पाशी पोहचलो. जवळ जवळ १ किलोमीटर लांब धरणाची भिंतीवर चालून आम्ही पलीकडच्या बाजूला म्हणजे धरणाच्या मागच्या बाजूला (बॅक वॉटर) पोहचलो. ही जागा अतिशय सुंदर आणि शांत आहे, आम्ही काही काळ तिथे विश्राती घेतली, छान छान फोटो काढले आणि गुमताराच्या दिशेने कूच केली.
सकाळी ११:३० वाजता आम्ही पायथ्याशी असलेल्या गावात (आदिवासी पाडा) पोहोचलो आणि गुमताराकडे जाणाऱ्या मार्गाची चौकशी केली. स्थानिकांच्या मदतीने आम्ही डोंगराजवळ पोहोचलो, पण नेमका कोणता मार्ग आम्हाला गुमतारा किल्ल्यावर घेऊन जाईल याबाबत शंका होती. आम्ही गावातील काही व्यक्तीं कडे चवकशी केली, त्याने आम्हाला अंदाजे मार्ग दाखवला आणि "बैल कडच्या" मागच्या बाजूला जायला सांगितले, पण शेवटची ओळ एकूण आमचा तणाव वाढला "गुमतारा किल्ल्यावर या वाटेनं कोण्ही जात नाही आणि आम्ही ही कधी या वाटेने गेलो नाही!". त्यांने सांगितल्या प्रमाणे आम्ही पुढे गेलो आणि अजून एका घरा शेजारी जाऊन चौकशी केली, त्यांनी पण बैल कड्याची वाट दाखवली आणि पाण्याच्य ओढ्याच्या उलट्या दिशेने वर जायला सांगितले. आम्ही त्यांना सोबत मार्गदर्शक म्हणून येण्याची विनंती केली, पण त्यांची शेतीची कामे चालू असल्या कारणाने त्यांने नकार दिला तसेच त्यांच्यातील पण या वाटेने किल्ल्यावर कोणी गेले नव्हते!
![]() |
| गावातील घर आणि शेती |
टीप: प्रचलित मार्ग अंबाडी--> दुगड--> मोहिलील गाव आहे, जिथून गुमतारा ट्रेक सुरू होतो, पण आम्ही अपरिचित किव्हा कमी रहदारीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होतो; फक्त तज्ञ आणि योग्य ट्रेकिंग उपकरणांसह प्रयत्न करा.
गावकर्यांनी दिलेली मार्गदर्शनाचे पालन करून आम्ही जंगलात प्रवेश केला आणि पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशने चालायला सुरुवात केली. पुडील १० ते १५ मिनिटातच आम्ही अश्या ठिकाणी पोहचलो जिथून पुढे जाण्याची वाट बंद होत होती आणि ओढ्यांच्या खडकांवरून चडून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. आम्ही जवळपास १० ते १५ मिनिटे मार्ग शोधत होतो अखेर थकलो आणि आम्ही तिघे एका झाड खाली विश्रांती साठी बसलो. पुढे काय करायचे याची चर्चा करत असताना माझे लक्ष सहज झाडावर गेले, पाहतो तर काय एक मोठा कोळी त्याच्या विणलेल्या जाळ्यात बसला होता, याला "जायन्ट वूडन स्पायडर" असे म्हणतात हा अंदाजे १ ते १.५ इंच लांब असतो. आम्ही तिकडनं बाजूला झालो आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचे ठरविले. हे जंगल घनदाट आणि कमी वर्दळीचे आहे हे आमच्या लक्षात आले होते, शैलेश ने पुन्हा एकदा वाट शोधण्याचा प्रयत्न चालू केला आणि यावेळी त्याला मळलेली पायवाट सापडली.
![]() |
| गुमतारा जंगल आणि गावकर्यांनी केलेल्या वेशीच्या खुणा |
मिळालेल्या पायवाटेवर चालत आम्ही पुढे गेलो आणि २० मिनिटांत एक छोटा डोंगर (टेकडी) पार केली. १५ मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो आणि दरी मधील ओढ्या पाशी पोहचलो, ओढ्याला पाणी नव्हते, पण पावसात प्रवाह मात्र मोठा असणार हे मोठं मोठे खडक पाहून लक्षात येत होते, हा दुसरा ओढा पार केला आणि पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्या वर आम्हाला त्याच ओढ्यात पाण्याचा जारा सापडला, आजू बाजू चा परिसर पहिला आणि पाणी स्वाच्या असल्याची खात्री करून घेतली, आम्ही आमच्या रिकामी झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पाणी भरण्याच्या नादात आम्ही मुख्य वाट सोडून दुसऱ्याच वाटे वर चालू लागलो, पुढे गेल्या वर ती वाट बंद झाली आणि आम्ही पुन्हा मागे फिरून जिथे पाण्याच्या बाटल्या भरल्या होत्या त्या ठिकाणी आलो. गूगल मॅप्स च्या साह्याने गुमतारा किल्ल्याच्या ठिकाणाशी आमच्या स्थानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण जंगलाच्या मध्य भागी आलस्य कारणाने मोबाइलला ला नेटवर्क नव्हते, आणि जे थोडे फार नेटवर्क होते ते जिओ सिम लाच. गूगल मॅप्स सुद्धा आम्हाला गंडवत आहे हे लक्षात येताच आम्ही विकसित तंत्रज्ञान खिशात टाकले आणि शैलेश ने त्याच्या अनुभवाचा वापर करत रस्ता शोधून काढला, पण पुन्हा आमची जवळपास ३० मिनटे वाया गेली होती!
टीप: आता पर्यंत जितके ट्रेक केलेत त्यात एक गोष्ट लक्षात आली, की जिओ सिमची नेटवर्क जंगलात बऱ्यापैकी मिळते, म्हणून ट्रेकला जनता, जिओचे सिम न विसरता घेऊन जातो.
दुपारचे जवळपास १:०० वाजले होते, आणि आम्ही अर्धा ट्रेक पूर्ण करून एका पठार सदृश्य जागेवर पोहचलो होतो, हे पठार म्हणजेच "बैल कडा" वरची मागची बाजू. तिथून उसगाव धरण स्पष्ट दिसत होते. जवळ जवळ अर्धा तास चालल्यावर पुन्हा एकदा पायवाट अस्पष्ट झाली आणि पुन्हा वाट शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले. नुकताच पावसाळा संपला होता, रान माजले होते पायवाट झाडाझुडपांनी व्यापलेली होती. शैलेशने मार्ग मोकळा केला, आणि आम्ही गुमताऱ्याच्या दिशेने पुढे निघालो. जंगलाचे घनत्व इतके होते की भर दुपारी सूर्याचे दर्शन होत नव्हते तसेच सूर्य किरणांचा प्रकाश क्वचितच जमिनीवर पडत होता! जिओ सिम ला जे थोडे फार नेटवर्क होते तेही नाहीसे झाले होते, म्हणजे जर काही प्रसंग उद्भवला तर मदद मागवणे सुद्धा शक्य नव्हते.
आम्हाला पुढे गेल्या वर आणखी एक छोटासा ओढा लागलं, ओढ्याच्या पलीकडेच एक पाय वाट जात होती पण ती आमच्या निदर्शनास आली नाही आणि आम्ही ओढ्याच्या विरुद्ध दिशेने चढायला चालू केले, आणि काही अंतर पुढे जाऊन ओढ्याच्या पलीकडच्या बाजूने प्रदक्षिणा घालत शिखराच्या पलीकडच्या बाजूस पोहचलो. पुन्हा एकदा वाट अस्पष्ट झाली आणि पुढे जाण्याचा मार्ग काही सापडेना. यशापासून थोडेच अंतर दूर होतो, डोंगर माथा निव्वळ ३ ते ४ माजली उंचावर होता, पण स्पष्ट वाट काही सापडत नाही होती. शैलीचे लक्ष मात्र घड्यावर होते, दुपारचे दोन वाजले होते. पुढचे १० ते १५ मिनिटे वाट शोधण्याचा प्रयत्न कारेन, नाही सापडली तर परतीच्या प्रवासाला सुरवात करू असे शैलेश ने सांगितले. "हिवाळ्याचे दिवस होते, सूर्य लवकर मावळणार त्यात घनदाट जंगल म्हणजे लवकर अंधार होणार, तसेच जरी योग्य वाट सापडली आणि किल्ल्यावर पोहचलो तरी परतीच्या प्रवास दरम्यान वाट शोधण्यात त्रास झाला असता. आम्ही ज्या वाटेने आलो त्या वाटेत २ ते ३ तासाच्या प्रवास दरमण्या मानवी वस्ती किव्हा तिच्या खुणा दिसत नव्हत्या. ज्या वाटेने आलो होतो ती वाट अस्पष्ट आणि लंपन डाव खेळणारी होती. ह्या सर्व बाबी लक्षात घेणे अनिवार्य होते". शैलेश ने पुढची १० मिनिटे, वाट शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण स्पष्ट वाट काही सापडली नाही. अखेरीस आम्हाला थांबावे लागले आणि परतीचा प्रवासाला सुरवात केली.
परतीच्या प्रवासाला सुरवात केली खरी, पण ज्या मार्गाने आम्ही आलो होतो तो मार्ग आम्हाला सापडत नव्हता, थोडासा गोंधळ ऊधाला, पण शैलेश ने मात्र डोक शांत ठेवत मार्ग शोधून काढला! आम्ही उतरत असताना ओढ्या जवळ पोहचलो आणि मळलेली वाट आमच्या निदर्शनास पडली, वरील सांगितल्या प्रमाणे हीच वाट जी आम्हाला दिसली नव्हती. सापडलेल्या वाटेने पुन्हा गडावर जाण्याचा प्रयत्न करावा असे वाटत होते, पण वेळ संपला होता, वाट भेटूनही आम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिलो आणि आम्ही आमच्या मनावर आवर घातला व सरळ खाली उतरायला सुरुवात केली. आम्ही पठारावर पोहचलो (बैल कडा). आणि मळलेल्या वाटेने उतरणे चालू ठेवले, पुढे गेल्यावर लक्षात आले की ज्या वाटेने आम्ही आलो होतो ती ही वाट नाही (कारण ज्या वाटेने आलो होतो त्या वाटेने मागे वळून पाहिल्यास उसगाव धरण दिसत होते). आम्ही घाई घाईत डाव्या बाजूची वाट न घेता उजवी कडील वाटेने उतरत होतो. पण ही वाट सुद्धा खाली जात होती म्हणून आम्ही पुन्हा मागे फिरून वेळ वाया न घालवता, आहे त्याच वाटेने उतरणे चालू ठेवले. आम्ही ज्या वाटेने आलो होतो त्यापेक्षा ही वाट स्पष्ट आणि मळलेली होती, त्यामुळे आम्ही निवांतपणे पुढे जात राहिलो.
तासभर उतरल्यानंतर आम्हाला शेत मांगर दिसला, हे पाहून आम्ही निर्धास्त झालो कारण या वाटेवर मानवी उपस्तीथी असल्याचे लक्षण होते. काही वेळातच आम्ही एका धबदब्या जवळ पोहचलो, जिओ सिमला नेटवर्क आले होते म्हणून आम्ही गूगल मॅप वर शोधले आणि त्या धबधब्याचे नाव "बोकड कडा" असे आढळले. धबधब्याला पाणी नव्हते, आणि पाणी जरी असते तरी अंघोळ करण्याकरिता आमच्या कडे वेळ नव्हता! सूर्यास्ताच्या आधी पायथ्याच्या गावात पोहोचायचे होते म्हणून आम्ही पुढे जात राहिलो. सायंकाळी ४:३० च्या सुमारास, आम्ही ओढ्या जवळ पोहोचलो, १५-२० मिनिटे विश्रांती घेतली, ओढ्याच्या पाण्यात हात पाय धुतले आणि पायांना विश्रंती दिली. आता आमच्या जीवात जीव आला होता आणि मन आणि शरीर तरतरीत झाले होते. काही फळे आणली होती ती खाल्ली आणि पुढे निघालो. १०-१५ मिनिटे चालल्यानंतर आम्ही पाहिले की गावकरी शेतीच्या कामात व्यस्त होते. आम्ही वज्रेश्वरीला जाणाऱ्या मार्गाबद्दल विचारले त्यांने आम्हाला, "शैतान पुल" पर्यंत याच मार्गाने चालत रहावे आणि तिथून तुम्हाला ऑटोरिक्षा मिळेल असे सुचविले. आम्ही आमचे सध्याचे लोकेशन जाण्याकरिता गूगल मॅप पुन्हा चालू केले आणि पाहून आश्चर्याचा धक्काच पोचला. आम्ही (उसगाव) सुरुवातीच्या ठिकाणापासून १५-१६ किमी दूर घोटगाव येते होतो, जे वज्रेश्वरी मंदिराच्या पलीकडे आहे.
वज्रेश्वरी मंदिरापूर्वीचा चौथा थांबा असलेल्या उसगाव धर येथून आम्ही सुरुवात केली आणि वज्रेश्वरी मंदिरानंतरचा पुढील थांबा असलेल्या घोटगावला उतरलो.
![]() |
| सेल्फी - मी, विलास काका आणि शैलेश दादा |
अंदाजे ३० मिनिटे चालल्यानंतर आम्ही एका गावात पोहोचलो आणि सुदैवाने आम्हाला एक ऑटोरिक्षा मिळाली. ऑटो चालक एक भली व्यक्ती होती; आम्ही त्याला शैतान पुल येथे सोडण्यास सांगितले, परंतु त्याने आम्हाला गणेशपुरी बस डेपोत उतरण्यासाठी सुचविले, जेणेकरून आम्हाला वसई किंवा विरार आगारासाठी बस मिळेल. संध्याकाळी ५:३० च्या सुमारास गणेशपुरी बस डेपोत पोहोचलो. आम्ही संध्याकाळी ६:०० वाजता येणाऱ्या बसची चौकशी केली. पण नेहमीप्रमाणे MSRTC बस संध्याकाळी ६:३० वाजता उशिरा व आधीच भरून आली होती, बसमध्ये उभे राहण्यासाठी जागा नव्हती. म्हणून आम्ही रिक्षाने जायचे ठरवले, १५० रुपये खर्च केले आणि संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विरार स्थानका जवळ पोहोचलो. आम्ही चर्चगेट लोकलमध्ये चढलो आणि रात्री ८:५० च्या सुमारास गोरेगाव स्टेशनवर उतरलो.
आम्ही गड माथ्यावर पोहोचलो नाही, ट्रेक अपूर्ण असला तरी पण घनदाट जंगलात फसल्याने वाट शोधण्याचा नवीन अनुभव मिळाला आणि निसर्ग सौंदर्य अनुभवले. पुढच्या वेळी उसगाव धारणा मार्गेच गुमतार किल्ला गाठू असा परतीच्या प्रवासात निश्चय केला. पाहू आता कधी योग जुळून येतो ते! शैलेश दादा आणि विलास काका यांचे खूप खूप आभार!









