विसापूर गड भ्रमंती



प्रवासाची तारीख: २६-डिसेंबर-२०१९
वाहतुकीची पद्धत: ट्रेन



विसापूर किल्ल्याचा इतिहास


    विसापूर किल्ला समुद्रसपाटीपासून ३५५६ फूट उंचीवर आहे. विसापूरच्या डोंगरात भाजे लेणी आहेत जी इ.स.पू. २ रे शतक मध्ये हिनयान बौद्ध परंपरेच्या काळात बांधण्यात आली. किल्ल्याच्या आत पाण्याच्या टाकीवर एक प्राचीन शिलालेख आहे जो ब्राम्ही लिपीत लिहिलेला आहे, तो पाहून आपल्याला कळते की हा किल्ला किती जुना आहे. सुमारे १५०० ते २००० वर्षांपूर्वी (१००-७० ईसापूर्व) प्राचीन सातवाहन युगात ब्राम्ही लिपी वापरली जात असे.

    १७१७ ते १७२० च्या दरम्यान मराठा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि ती मजबूत केली. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि लोहगड किल्ल्यावर तोफ गोळ्यांचा मारा सुरु केला, कारण विसपूर किल्ल्याची उंची लोहगड किल्ल्यापेक्षा जास्त होती आणि दुसऱ्याच दिवशी ब्रिटिशांनी लोहगड किल्ला जिंकला. इतर किल्ल्यांप्रमाणे विसपूर किल्ल्यावर तुम्हाला कोणतेही प्रवेशद्वार दिसणार नाही कारण ब्रिटिश सैन्याने गडाकडे जाणारे सर्व दरवाजे व मार्ग सुरुंग लावून नष्ट केलेत. जेणेकरून भविष्यात मराठा सैन्याला पुन्हा गडावर ताबा मिळवता येणार नाही.



प्रवास आणि ट्रेकिंगचा अनुभव


    आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ६.४० वाजता मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसने प्रवास सुरू केला आणि सकाळी ९:१० वाजता लोणावळा स्थानकात उतरलो. पुणे लोकल ट्रेन येयायला बराच वेळ होता, म्हणून न्ह्यारी करण्याकरिता लोणावळा स्थानकात बाहेर आलोत. अंदाजे ५०० ते ६०० मीटर अंतरावर आनंद रेस्टॉरंट (ढाबा) मध्ये न्ह्यारी केली. न्ह्यारी पूर्ण करून आम्ही पुन्हा लोणावळा स्थानकात आलो आणि १०.१० वाजताची पुणे लोकल पकडली आणि पुढच्याच स्टेशनवर म्हणज मळवली स्थानकात उतरलो.

    अवघ्या १० मिनिटात सकाळी १०:२० च्या सुमारास मळवली येथे उतरलो आणि विसापूर किल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेल्या पुलाच्या टोकापासून डावीकडे वळून आम्ही पाटण गावी पोहोचलो. सुरुवातीला, योग्य मार्गावर येण्यासाठी आम्ही गावकऱ्यांची मदत घेतली. पाटण गावापासूनचा ट्रेक मार्ग तुम्हाला एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो. घनदाट जंगल आणि छोटे धबधबे मन प्रसन्न करतात. चढाई करताना, डावीकडे पाटण गाव आणि उजवीकडे विसापूर किल्ला ठेवावा. गावकऱ्यांनी मार्गदर्शनाकरिता खडकांवर बाणाचे चिन्ह काढलेले आहेत. अर्धा ट्रेक पूर्ण केल्यानंतर गडाची तटबंदी निदर्शनास पढली.

विसापूर रेल्वे बोर्ड

ओव्हरहेड ब्रिज वरील दिशादर्शक फलक
ओव्हरहेड ब्रिज वरील दिशादर्शक फलक

    गडमाथ्यावर पोहचण्या आधी एका छोट्याश्या लेणीजवळ पोहचलो, या लेणीमध्ये हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे, म्हणून या लेणीला मारुती लेणी असे नाव दिले आहे. लेणीमध्ये पर्यटकांची गर्दी असल्यामुळं, बाहेरूनच शिल्प पाहिले आणि पुढे निघालो. लेणीला लागूनच गडावर जाण्याकरिता दगडी पायऱ्या लागतात. पावसाळ्यात या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी फार सुंदर दिसते. दोन तासांची चढाई करून, दुपारच्या सुमारास अंदाजे १२.३० वाजता आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो. 

    गडमाथ्यावर पोहचताच आम्ही उजवीकडे वळत, गडाच्या पश्चिम दिशेस चालू लागलो, काही अंतर पुढे गेल्यावर पाण्याचं ताक व उद्वस्त वास्तू दिसली. पाण्याच्या टाक्याजवळच बसून आणलेला खाऊ खाल्ला आणि गडभ्रमंती साठी तरतरीत झालो. पश्चिम दिशेस सरळ चालत राहिलो आणि पाण्याच्या टाक्यांजवळ पोहचलो. तसेच गडाच्या तटा जवळ दोन छोट्या तोफा ठेवलेल्या दिसल्या. जसजसे पुढे जात होतो तस तसे पाण्याच्या टाक्यांची शृंखला दिसत होती. गडाच्या तटबंदीजवळ पोहचलो. गडाची तटबंदी आजही सुस्तिथित व भक्कम आहे. आम्ही तटबंदीवरुन दक्षिण दिशेला म्हणजे लोहगडाच्या दिशेने चालत राहिलो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला चुन्याच्या घेण्याचे अवशेष दिसले, जोतेही तिथेच ठेवलेले होते, फोटो काढले आणि पुढे चालत राहिलो. तटबंदीवरुन बाहेरच्या बाजूस वाकून पहिले असता, गडाखालील जंगलातील गर्द झाडी एका फुल कोबी सारखी दिसत होती. अवघ्या १५-२० मिनिटात आम्ही दक्षिण दिशेस असलेल्या गडाच्या शेवटच्या बुरुजाजवळ पोहचलो. बुरुजावरील हिंदवी स्वराज्याचा भगवा डवलणे फडकत होता तसेच लोहगडाची तटबंदी व पावना तलाव स्पष्ट दिसत होते. थोडावेळ तिथे घालवला आणि माघारी फिरत पुन्हा गडभ्रमंतीला सुरुवात केली. 

गडावरील तोफ
गडावरील तोफ

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

    मागे फिरून गडाच्या मुख्य दरवाज्याकडे जाते वेळी आम्ही पाण्याच्या टाक्यात कोरलेले मारुतीचे शिल्प शोधत होतो, पण ते काही आम्हाला दिसले नाही. नंतर आमच्या लक्षात आले कि ते शिल्प पठाराच्या खालच्या बाजूस आहे आणि आम्ही पठारावरच्या वरच्या बाजूने पुढे गेलो. विसापूर गड हा दोन डोंगरांनी जोडलेला आहे, दोन डोंगर जोडले गेलेत व मुख्य दरवाजाच्या पायवाट जवळ एक मोठी तोफ ठेवलेली आहे. तोफ पाहून आम्ही पुढे गेलो ते थेट शिव मंदिरात. शिव मंदिराच्या आवारात एक सुंदर दीपमाळ आहे व मंदिराच्या मागच्या बाजूस विहीर आहे. मंदिर जास्त मोठे नाही पण ५-६ जणांना राहता येईल एवढे आहे. काही वेळ मंदिरात घालवला, ग्रुप फोटो काढला आणि परतीच्या प्रवासा करीत निघालो. आम्ही पाटण मार्गे गडावर आलो होतो पण उतरते वेळी लोहगड वाडी मार्गे उतरायचे असे ठरले. पुढे जाते वेळी आम्हाला राजवाड्याचे अवशेष दिसले, राजवाड्याचा आवारात एक पाण्याचे टाके होते त्यावर काही कोरले होते, कंदाची शिलालेख असावा. तेथे काही कॉलेज ची मुले बसले होते. त्यांना त्रास नको म्हणून दुरूनच पाहून पुढे निघालो आणि तसेही आम्हाला बराच उशिराही झाला होता, जास्त वेळ न घालवता पुढे निघालो. संपूर्ण गड पाहण्यासाठी सुमारे ३ ते ४ तास लागले. वेळेच्या मर्यादेमुळे आम्ही उतरायला सुरुवात केली. उतरतेवेळी आमच्या समूहातील सदस्य (विनायक काळे) याच्या बुटांचे सोल निघाले. अशावेळी युक्ती कामाला येते, पायातील मोवजे काडून बुटांवर चढवले. तसेच मी सुद्धा एक मूर्खपणा केला होता ट्रॅक पँट ऐवजी जीन्स पँट घातली होती यामुळे उतरतेवेळी फ्लेक्सिबिलिटी मिळत नव्हती. कसे बसे करत आम्ही १६ जण अंदाजे ४:३० वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. गायमुख खिंडीतून चालत आम्ही लोहगड वाडीच्या रस्त्यापर्यत पोहचलो. तिथे आम्ही चहा आणि नाश्ता घेतला, आम्ही लोणावळ्याला जेवण करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला लोणावळा लोकल आणि पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस पकडायची होती (ट्रेनच्या वेळेसाठी एम-इंडिकेटर अॅपची मदत घ्या आणि त्यानुसार नियोजन करा). 

    नाश्ता करून झाला आणि आता माळवलीला कसे जायायचे हा विचार करत होतो इतक्या एक टेम्पो दिलासा, टेम्पो वाल्याला हात दाखून थांबवले. आम्हाला माळ्वळीला सोडणार का? असे विचारले असता त्याच्याकडून होकार मिळाला. देवच पावला! आम्ही सर्वजण टेम्पोत बसलो आणि अंदाजे ५:१५ च्या सुमारास माळ्वलीला पोहचलो. टेम्पो वाल्याला त्याचे भाडे दिले आणि मळवली स्थानकात पोहचलो, ५:३० ची लोकल ट्रेन पकडली आणि ५:४५ च्या दरम्यान लोणावळ्याला पोहचलो. भटकंती करतेवेळी वेळेचे आणि जेवणाचे भान राहत नाही असेच काहीसे आमचे झाले होते. सायंकाळी ६:०० वाजता आम्ही लोणावळ्यात जेवणाकरिता रेस्टऑरेंत शोधत हिंडत होतो. अखेरीस रेस्टऑरेंत सापडले, जेवण पूर्णकेली आणि लोणावळ्याची चिकी घेतली आणि सायंकाळी ६:४७ ला आलेली पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पकडून अंदाजे रात्री ९:४० ला मुंबईला पोहचलो. (टीप:- आरक्षण नसल्यास प्रवास त्रासदायक तर होतोच पण, जनरल बोगी मध्ये चढे सुद्धा कठीण होते).



गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे


पाण्याची टाकी
शिव मंदिर
सदर किंवा पेशवे वाडा
हनुमान कोरीव शिल्प
तोफ



जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे


जर तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन चांगले केले आणि तुम्ही नियमित ट्रेकर असाल तर,
 तुम्ही किमान तीन आणि जास्तीत जास्त चार ठिकाणांना भेट देऊ शकता.

१. भाजे लेणी,
२. लोहगड किल्ला,
३. कार्ला लेणी / एकवीरा देवी मंदिर



गडावरील शिवलिंग (शिव मंदिर)
गडावरील शिवलिंग (शिव मंदिर)  

दीपस्तंभ
दीपस्तंभ

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

गडाची तटबंदी
गडाची तटबंदी

गडावरील पाण्याचे टाके
गडावरील पाण्याचे टाके


केदारनाथ, तुंगनाथ ट्रेक आणि धार्मिक यात्रा - भाग २


प्रवासाची तारीख: २१ मे ते २७ मे, २०२५
वाहतुकीची पद्धत: ट्रेन आणि खाजगी वाहन


तुंगनाथ मंदिर व परिसर माहिती

 
    तुंगनाथ मंदिर हे जगातील सर्वात उंच शिव मंदिरांपैकी एक आहे आणि भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित पंचकेदार मंदिरांपैकी सर्वात उंचावर आहे. तुंगनाथ (शब्दशः अर्थ: शिखरांचा स्वामी), तुंगनाथ पर्वत मंदाकिनी आणि अलकनंदा नदीच्या खोऱ्या बनवतात. तुंगनाथ मंदिर ३,६८० मीटर (१२,०७३ फूट) उंचीवर आणि चंद्रशिला शिखराच्या अगदी खाली आहे. हिवाळ्याच्या काळात, मंदिर बंद केले जाते आणि देवतेची प्रतीकात्मक प्रतिमा आणि मंदिरातील पुजारी मक्कुमठ गावातील मार्कंडेश्वर मंदिरात हलवले जातात, जे येथून २९ किमी अंतरावर आहे. ते चोपटा पासून उखीमठ पर्यंत १० किमी अंतरावर दुग्गलबिठा जवळ आहे. 

तुंगनाथ मंदिर शिखर - (फोटो श्रेय - अमेय विपट)
तुंगनाथ मंदिर शिखर - (फोटो श्रेय - अमेय विपट)

    चोपटा आणि तुंगनाथ मंदिराच्या दरम्यानच्या दरीत वृक्षाच्छादित टेकड्या आहेत ज्यात समृद्ध अल्पाइन कुरण आहेत ज्यात रोडोडेंड्रॉन कोपिसेस आहेत आणि शेतीची शेते देखील आहेत. मार्चमध्ये जेव्हा रोडोडेंड्रॉन पूर्णपणे बहरतात तेव्हा ते किरमिजी रंगापासून गुलाबी रंगापर्यंत चमकदार रंग दाखवतात. गढवाल विद्यापीठाचे उंचावर असलेले वनस्पतिशास्त्र केंद्र येथे आहे. मंदिराच्या माथ्याजवळ, केदारनाथ पर्वतरांगांच्या अगदी समोर, दुगालीबिट्टा येथे एक वन विश्रामगृह आहे. केदारनाथ वन्यजीव अभयारण्य, ज्याला केदारनाथ कस्तुरी मृग अभयारण्य असेही म्हणतात, १९७२ मध्ये या प्रदेशात असलेल्या धोक्यात असलेल्या कस्तुरी मृगांचे जतन करण्यासाठी स्थापन करण्यात आले होते , तसेच चोपटाजवळील खारचुला खरक येथे कस्तुरी मृग प्रजनन केंद्र देखील आहे. (साबार - विकिपीडिया)


अल्पाइन संशोधन केंद्र फलक
अल्पाइन संशोधन केंद्र फलक

चोपता - तुंगनाथ - चंद्रशिला ट्रेक नकाशा
चोपता - तुंगनाथ - चंद्रशिला ट्रेक नकाशा

वनस्पती आणि प्राणी माहिती फलक
वनस्पती आणि प्राणी माहिती फलक





महत्वाच्या सूचना

  • तुंगनाथ ट्रेक करिता, बॅगेचे वजन जितके कमी ठेवता येईल तितके कमी ठेवावे. महत्वाची औषधे, रेनकोट, गरम कपडे (जॅकेट), एक एक्सट्रा जोड कपडे (ड्राय फिट), अतिरिक्त मौजे, हेड टॉर्च, पॉवर बँक, पाणी बाटली इतके सामान पुरेसे आहे. 
  • महत्वाची औषधे जसे कि (ताप, सर्दी, उलटी व जुलाब यांच्यावरील औषधे आणि इलेक्ट्रॉल / एनर्झल पावडर) सोबत ठेवावीत.
  • तुंगनाथला पालखीची (डोली) व्यवस्था फार कमी प्रमाणात आहे.
  • तुंगनाथ ट्रेक हा ४ किलोमीटरचा असून येथील चड बऱ्यापैकी तीव्र आहे.
  • केदारनाथ सारखेच येथे सुद्धा, गर्दीचे नियोजन करण्याकरिता गाड्या चोपताला थांबवून पार्क केल्या जातात, व पुडील प्रवास शटल (जीप) किव्हा पायी करावा लागतो.

प्रवासवर्णन


दिवस पाचवा 


    आदल्या दिवशी पाऊस पडल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी दरड कोसळून ट्राफिक जॅम झाले होते, त्यामुळे लॉजवर पोहचायला उशीर झाला होता. तसेच हवामानाचा अंदाज घेतला असता चोपता तुंगनाथ येथे सकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती, म्हणूनच तुंगनाथ ट्रेक करिता उशिरा निघायचे ठरवले होते. २५ मे, २०२५ सकाळी ८ ते ८:३० च्या दरम्यान आम्ही उठवलो. सर्वात पहिले मी माझ्या पायाच्या बोटांना आलेले फोड तपासले. अँटी फंगल पावडर मुळे ते थोडे सुकले होते, त्यामुळे तुंगनाथ ट्रेकला चालण्यास काही त्रास होणार नाही याची आशा होती. मागील दोन तीन दिवस जशी धावपळ चालू होती त्यामनाने आज सर्व काही निवांत चालू होते. सर्वांनी न्याहारी करून घेतली आणि अंदाजे सकाळी ११:१० च्या दरम्यान आम्ही चोपताच्या दिशेने प्रस्थान केले. ह्यावेळी ३ ऐवजी ४ गाड्या होत्या, हेलिकॉप्टरने आलेले, पेडणेकर कुटुंब सोबत होते. दोनदिवस झालेल्या दगदगीमुळे अमेयची आई मात्र आराम करण्या करिता लॉज वरच थांबली होती. पावसाचे वातावरण असल्याकारणाने मी फक्त पॉन्चो (रेनकोट) घेतला होता, बॅगेत जास्त वजन नको म्हणून मी गरम कपडे (जॅकेट) घेतलं नाही. जसजशी गाडी उंचावर जात होती तसतशी थंडी वाढत होती आणि जॅकेट न घेतलेल्याला पश्चाताप होऊ लागला. येथे सुद्धा गर्दीचे नियोजन करण्याकरिता पोलिसांनी २ ते ३ किलोमीटर आधीच पार्किंग स्थळ बनवले आहे. तुंगनाथला जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या इथेच उभ्या करायला लावतात व पुढील प्रवास शटल (जीप) द्वारे किव्हा पायी करावा लागतो. आमच्या गाडीतील ड्रॉयव्हरने शकलं लढवली, पोलिसांना बद्रीनाथला चाललो आहे असे सांगून आम्हाला पुढे पर्यंत आणून सोडले. थोड्याफार प्रमाणात ट्राफिक जॅम असल्या कारणाने येथे सुद्धा ३०० ते ४०० मीटर आधीच गाडीतून उतरून चालत तुंगनाथ प्रवेश कमानीजवळ पोहचलो. अंदाजे २ तासांच्या प्रवासानंतर दुपारी १:१५ वाजता आम्ही पोहचलो होतो. 

तुंगनाथ ट्रेक प्रवेश कमान
तुंगनाथ ट्रेक प्रवेश कमान

    समूहातील बरेच सदस्य, शॉपिंग करिता सर्वत्र पसरले 😃. मी मात्र थंडीने गारठलो होतो, चहा पिऊन शरीराला थोडी ऊर्जा दिली. अमेयचे वडील मात्र वरती मंदिराकडे जाण्यास तयार नव्हते, ते गाडीतच बसून राहणार होते. कौशलने यावेळी खेचराने जाण्याचा निर्णय घेतला, त्याची तब्बेत थोडी बिघडली होती, म्हणून मी सुद्धा त्याला चालत जाण्या करिता जबरदस्ती केली नाही. केदारनाथ ट्रेक करून दमलेल्या बऱ्याच सदस्यांनी यावेळी खेचराने जाण्याचा निर्णय घेतला होता. विजय व अमेय सर्वांना खेचराची व्यवस्था करून देण्याकरिता मागे थांबले होते. रिम झिम पाऊस पडत असल्या कारणाने मी पॉन्चो घातला व १:३० च्या सुमारास ट्रेकला सुरुवात केली. पाऊस व ढगाळ वातावरण पाहून मन निराश झाले होते, वातावरण जास्तच बिघडल्यास ट्रेक रद्द करावा लागेल कि काय अशी भीती वाटू लागली. थोड्याच अंतरावर राहुलशी भेट झाली त्याच्या सोबत गप्पा मारत ट्रेक चालू होता. बरीचशी मंडळी मागे असल्या कारणाने आम्ही रमत गमत फोटो व टाइम लॅप्स काडत चालत होतो. चालत असते वेळी, समोरून खेचाराने खाली उतरत येणाऱ्या काकी, खेचरावरून पडता पडता राहिल्या. खेचराचा पाय घसरल्याने खेचराचा तोल गेला व त्यावर बसलेल्या काकींचाही तोल गेला. खेचरं सांभाळणाऱ्या व्यक्तीने वेळीच त्यांचा झेल घेतला व त्यांना खाली पडण्या पासून वाचवले. हे दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके चुकले, मी स्तब्ध झालो. काकींना कोणतीही इजा झाली नव्हती, पण त्या घाबरल्या होत्या. मी पुढे निघालो, जस जसे वर जात होतो तस तसे वातावरण मोकळे होत होते, पाऊस थांबला होता. थोड्याच वेळानी समूहातील सर्व सदस्य खेचराने पुढे जाताना दिसली, सर्वांना टाटा बाय बाय केले 😁.


    राहुल आणि माझा गप्पा मारत ट्रेक चालू होता, मागून प्रदीप आम्हाला येऊन भेटला. आम्ही चालत असते वेळी एक सुंदर दृश्य दृष्टीस पडले आणि प्रदीपच्या मुखातून मौल्यवान उद्गार निघाले "इतना सुंदर नजरा उत्तराखंड मे है, तो पेहलगाम क्यू जाना" आणि हे खरच आहे काश्मीर सारखे सौंदर्य उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात पाहायला मिळते! काही अंतर पुढे गेल्या वर राहुल आणि इतर सदस्यांनी शॉर्टकट मारला व आमच्या पुढे निघून गेले, त्यांना पाहून प्रदीप आणि मी, आम्ही दोंघांनी पण दोन शॉर्टकट मारले. विश्रांती करीत थांबलेलो असताना, अमेयाचे वडील खेचरावरून येताना दिसले आणि मी चकित झालो. काका तर येणार नव्हते, गाडीत बसून राहणार होते. अमेयला मी फोन करून विचारले असता, तो ही वडिलांना पाहून चकित झाला होता, म्हणाला पेडणेकर काकांनी आग्रह केला तेव्हा तयार झालेत. (हम किसी से कम नही! वडिलांनी मुलाला दिलेले सरप्राईझ!) 🫡.  जे जे शॉर्टकट सोपे होते त्या त्या शॉर्ट्कटने आम्ही पुढे जात होतो. ४ किलोमीटरच्या ट्रेक पैकी २ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झाला होता. खेचरं विश्रांती करीत थांबले होते. पेडणेकर काकींनी आणलेले ठेपले आणि अमेयच्या वडिलांनी आणलेले बदाम खाऊन मी आणि प्रदीप पुढे निघालो. या वेळी राहुल बराच पुढे निघून गेला होता. 

हिरवेगार माळरान आणि हिमालय पर्वत रांगा
हिरवेगार माळरान आणि हिमालय पर्वत रांगा

    प्रदीप सोबत माझा ट्रेक चालू होता, पण प्रदीप मात्र बराच दमला होता. त्याने मला त्याच्यासाठी थांबू नये अशी सूचना दिली, मग काय टाकला पाचवा गियर आणि निघालो पुढे. जस जसे पुढे जात होतो तसे निसर्गाचे सौंदर्य अजूनच वाढत होते, हिमालयाच्या पांढरे शुभ्र पर्वत रांगा दिसू लागल्या तसेच मंदिराचे शिखरही दृष्टीस पडले. पुढच्या तासाभरात मंदिराजवळ पोहचू असा अंदाज वाटू लागला, तसे झाल्यास चंद्रशिला शिखरावर जाण्यास पर्याप्त वेळ मिळेल या आशेने ऑर्गनायझर विजयला फोन लावला. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे विजयला काही फोन लागला नाही, अमेय त्याचा सोबत आहे हे ठाऊक होते. अमेयला फोन लावून विजय कडे परवानगी मागितली असता विजयने चंद्रशिला शिखरावर जाण्यास परवानगी नाकारली, वातावरण केव्हाही बिघडू शकते! मी ही अनेक ट्रेक अरेंज केले होते, त्यामुळे सोबत आलेल्या सदस्यांची सुरक्षेची जवाबदारी ही ऑर्गनाईझर वर असते हे माहित होते. त्यामुळे विजयने दिलेल्या आदेशाचा मान ठेवत चंद्रशिला शिखरावर जाण्याचे भूत डोक्यातून काढून टाकले. लवकरात लवकर मंदिर गाठायचे ठरवत, चालण्याचा वेग वाढवला. थोडे अंतर पुढे गेल्यावर राहुल नायरशी पुन्हा भेट झाली. तोही चंद्रशिला शिखरावर जायायचे बोलू लागला. मी त्याला विजयने जाण्यास मनाई केली आहे असे सांगितले, पण तो काही ऐकेना (विजयने तुझे मना किया है, मुझे नाही और तुने मुझे कुछ बताया नाही 😂). ठीक आहे म्हणत आम्ही चालत राहिलो व एक भलामोठा शॉर्टकट घेत मंदिरा जवळ पोहचलो. आम्हाला खालून वरती मंदिरापर्यंत पोहचायला २ तास ३० मिनिटे लागली होती, संध्याकाळचे ४ वाजले होते.

तुंगनाथ मंदिर प्रवेश द्वार
तुंगनाथ मंदिर प्रवेश द्वार

    दर्शनासाठी लागलेली रांग पाहून, तासभर तरी वाया जाणार हे निश्चित होते. पादत्राणे काडून रांगेत उभे राहिलो. काही जुगाड होतो का पाहून येतो असे सांगून राहुल रांग सोडून पुढे गेला व २ ते ३ मिनिटातच धावत आला व मला बोलावून घेतले. पठ्ठ्याने नक्कीच काहीतरी जुगाड केला आहे म्हणत मीही त्याच्या मागोमाग धावत गेलो आणि खेचरांवर बसून पुढे आलेल्या सदस्यांन सोबत रांगेत जाऊन उभे राहिलो 😂(थोडीशी चीटिंग करून, रांगेच्या मधेच घुसलो होतो). रांगेतील इतर भाविकांनी आक्षेप घेत, बीचमे कहा घूस राहेहो, स्पेशल पास है क्या? विचारले असता मीही त्यांना, हा स्पेशल पास है, म्हणत पुढे गेलो 😂. अवघ्या १० ते १५ मिनिटात महादेवाचे दर्शन झाले. मंदिर परिसरातील इतर मंदिरे पाहण्यास निघालो. परिसरातील मंदिरे पाहून झाली आणि राहुल नायर चंद्रशिला शिखराकडे जातो असे सांगून निघाला. कौशल आणि प्रज्वल सोबत मंदिर परिसरात फोटोशूट केले आणि परतीच्या प्रवासाकरिता निघत असते वेळी अमेय आणि विजयशी भेट झाली. राहुल चंद्रशिला शिखराकडे गेल्याचा महत्वाचा निरोप त्याला देत मंदिर परिसरातून बाहेर पडलो आणि अमेयची प्रतीक्षा करत थांबलो, सोबत कौशल व प्रज्वलही होते. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा

तुंगनाथ मंदिर शिखर व पाच पांडव मंदिरे
तुंगनाथ मंदिर शिखर व पाच पांडव मंदिरे

    समूहातील सर्वानी तुंगनाथ महादेवाचे दर्शन घेतले होते. अमेय दर्शन घेऊन आल्यावर मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. विजय, पेडणेकर काकांसोबत मंदिराजवळच थांबला होता, तर कौशल आणि प्रज्वल खेचरांवरून जाणार होते. पुन्हा एकदा शॉर्टकट घेत मुख्य ट्रेकच्या रस्त्यावर येऊन अमेय आणि जोत्स्नाची प्रतीक्षा करत थांबलो. माझी भेट दोघांशी झाली आणि आम्ही तिघे गप्पा मारत खाली उतरू लागलो. काही अंतर पुढे आल्यावर अमेयने इथे पण एक कोकणकडा असल्याचे सांगितले. मी त्याला उत्सुकतेने कुठे आहे असे विचारले असता त्याने, एका छोटेखानी गणेश मंदिराकडे बोट दाखवले आणि म्हणाला, त्याच्या बाजूच्याच खडकावर जाऊन खाली पहा. मी उत्सुकतेने पुढे गेलो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि बाजूच्याच खडकावर झोपून, खाली वाकून पहिले असता खोल दारी दिसली आणि माझ्या हृदयाचे ठोके चुकले. मी झटकन मागे आलो, कुणास ठाऊक खडक मुरूम असल्यास दगड तुटून मी सरळ स्वर्गात 😅. खडकावर एक फोटो काढला आणि खडकावरून खाली उतरलो. पुन्हा गप्पा मारत मारत खाली उतरायला सुरुवात केली. जोत्स्ना, अमेय कडुन स्वतःचे बरेच फोटो काडून घेत होती, मला सुद्धा फोटो काढायचा मोह आवरला नाही आणि मीही अमेय (बॉस - दि आर्टिस्ट) कडुन वेग वेगळ्या अँगलने फोटो काडून घेतले. केदारनाथ ट्रेक वेळी राहिलेली कसर पूर्ण केली 😂. फिरायला जाते वेळी एक फोटोग्राफर मित्र सोबत जरूर असावा!

प्रत्येक अंधाऱ्या मेघामध्ये एक प्रकाशाचा झोत असतो. (फोटो श्रेय - अमेय विपट)
प्रत्येक अंधाऱ्या मेघामध्ये एक प्रकाशाचा झोत असतो. (फोटो श्रेय - अमेय विपट)
सूर्यास्त व आभाळात पढलेल्या लाल छटा.
सूर्यास्त व आभाळात पढलेल्या लाल छटा

    आम्ही फोटो काढण्यात इतका वेळ घालवला कि उशिरानं निघालेले विजय आणि इतर सदस्य, शॉर्टकट मारत आमच्या आधी पोहचले होते. आम्ही बऱ्यापैकी खाली पोहचलो होतो, एक दीड किलोमीटर आधी सूर्यास्त वेळेचा एक सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. सायंकाळी ७:१५ च्या दरम्यान आम्ही खाली पोहचलो व आमचा तुंगनाथ ट्रेक पूर्ण झाला. राहुल नायर वगळता सर्व सदस्य खाली पोहचले होते. विजयने राहुलला कॉल करून विचारले असता राहुलने १५ मिनिटात पोहचतो असे सांगितले आणि तो १५ मिनिटात खाली पोहचला. सर्वांनी त्याला सलाम करत त्याचे अभिनंदन केले. राहुल नायरने एक प्रकारे पराक्रमच केला होता. (स्वतः चे वजन १०० किलोहून अधिक, त्यात बॅगेचे १० ते १२ किलो वजन अधिकचे घेऊन तो चंद्रशिला शिखर सर करून आला होता!). आम्ही सर्वानी एक ग्रुप फोटो काढला. अमेय राहुल आणि निशिकांत यांच्या सोबत एक एक कप चहा प्यालो आणि गाडीत जाऊन बसलो. भूक लागली होती पण दुकानातील सर्व तेलकट पदार्थ पाहून लॉजवरच जाऊन जेवायचे ठरवले.

श्री राहुल नायर - चंद्रशिला शिखरावरून
श्री राहुल नायर - चंद्रशिला शिखरावरून

ग्रुप फोटो - तुंगनाथ ट्रेक पूर्ण केल्या नंतर. खाली बसलेले - प्रणाली व प्रसाद मागील उभे, डावीकडून उजवीकडे - जोत्स्ना, प्रदीप, अमेय, राहुल, निशिकांत, प्रथमेश (मी), विजय, अमेयाचे वडील.
ग्रुप फोटो - तुंगनाथ ट्रेक पूर्ण केल्या नंतर.
खाली बसलेले - प्रणाली व प्रसाद. मागील उभे, डावीकडून उजवीकडे -
जोत्स्ना, प्रदीप, अमेय, राहुल, निशिकांत, प्रथमेश (मी), विजय, अमेयाचे वडील.
 

    अंदाजे रात्री १०:०० वाजता आम्ही चंद्रपुरी येथील शिखर लॉजवर पोहचलो. यावेळी सर्वजण वेळेवर आले असल्याकारणाने लॉजवर लवकर पोहचलो होतो. सर्वांनी फ्रेश होऊन जेवण करून घेतले आणि रात्री ११:३० वाजता उनो खेळायला सुरवात केली ते रात्री १:३० वाजे पर्यत. दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर उठायचे नसते तर रात्रभर खेळत राहिलो असतो. अशा प्रकारे पाचव्या दिवसासोबत उत्तराखंडातील सहल बऱ्यापैकी संपली होती 😒. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा


दिवस सहाव्वा


    २६ मे रोजी सकाळी ८:०० वाजता विजय आमच्या रूम मध्ये आला व आम्हाला (मी, कौशल आणि प्रज्वल) झोपलेले पाहून चक्रावला. अरे अजून झोपला आहात! चला लवकर तयार व्हा, निघायचे आहे असे म्हणून विजय त्याच्या रूम मध्ये निघून गेला. उशिरा निघायचे असे रात्री ठरले होते, हा निर्णय केव्हा बदलला हे ठाऊक नाही. आम्ही फटाफट तयार झालो, सर्व सामान आवरले, बॅगा भरल्या आणि नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यावर, अभिप्राय सत्र (फीडबॅक सेशन) घेण्यात आले. सहल म्हणा, ट्रेक म्हणा किव्हा धार्मिक यात्रा म्हणा, इतके मजेशीर झाली होती कि, प्रत्येकाने दिलेला अभिप्राय हा सकारात्मक होता. निघण्या करीत कॉल आला आणि आम्ही आमच्या बॅगा घेऊन खाली उतरलो. सर्व बॅगा गाडीच्या तपावर चढवल्या आणि ग्रुप फोटो काढण्यात सर्व व्यस्त झाले. ग्रुप फोटो काढून झाल्यावर, शिखर लॉजला शेवटचा सलाम ठोकत निघालो ऋषिकेशच्या दिशेने.  



    अंदाजे सकाळी १०:३० वाजता आम्ही ऋषिकेशच्या दिशेने निघालो. श्रीनगरच्या अलीकडेच आमची गाडी ट्राफिक मध्ये अडकली, कारण विचारले असता कळले कि दरड पडून रस्ता बंद झाला आहे, दगड हटवण्याचे काम चालू आहे. जवळ जवळ ३५ - ४० मिनिटे वाया गेली. रस्ता मोकळा झाला आणि आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला. अंदाजे दुपारी १२:०० वाजता आम्ही धारी देवी मंदिराजवळ पोहचलो. देवीच्या दर्शनाकरिता गाडी थांबवली. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा


धारी देवी इतिहास


    धारी देवी हे भारतातील उत्तराखंडमधील गढवाल प्रदेशात श्रीनगर आणि रुद्रप्रयाग दरम्यान अलकनंदा नदीच्या मध्य भागी स्थित एक हिंदू मंदिर आहे. मंदिरात धारी देवीच्या मूर्तीचा वरचा अर्धा भाग आहे, तर मूर्तीचा खालचा अर्धा भाग कालीमठ येथे आहे, जिथे तिची देवी काली म्हणून पूजा केली जाते. तिला उत्तराखंडची संरक्षक देवी मानले जाते आणि चार धामांची रक्षक म्हणून पूज्य मानले जाते. श्रीमद् देवी भागवताने सांगितल्याप्रमाणे तिचे मंदिर भारतातील १०८ शक्तीस्थळांपैकी एक आहे.

    १६ जून २०१३ रोजी अलकनंदा हायड्रो पॉवरने बांधलेल्या ३३० मेगावॅट क्षमतेच्या अलकनंदा हायड्रो इलेक्ट्रिक धरणाच्या बांधकामासाठी, देवीचे मूळ मंदिर काढून अलकनंदा नदीपासून सुमारे ६११ मीटर उंचीवर असलेल्या काँक्रीटच्या प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आले. योगायोगाने, देवीची मूर्ती हलवल्यानंतर काही तासांतच, या भागात देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्तींपैकी एक आली. केदारनाथमधील चोरबारी हिमनदीवर ढगफुटी झाली, ज्यामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले ज्यामुळे संपूर्ण तीर्थक्षेत्र वाहून गेले आणि शेकडो लोकांचा बळी गेला. स्थानिक आणि भाविकांचा असा विश्वास आहे की उत्तराखंडला देवीच्या क्रोधाचा सामना करावा लागला कारण तिला तिच्या मूळ स्थानावरून हलवण्यात आले होते, जे पुरानंतर उद्ध्वस्त झाले.

धारी देवी प्रवेश द्वार
धारी देवी प्रवेश द्वार

    पुन्हा वळूया प्रवासवर्णनाकडे, चार गाड्यांपैकी दोन गाड्या मागे ट्रॅफिकमध्येच अडकल्या होत्या, आम्ही (मी, कौशल, विजय, प्रज्वल) धारी देवीच्या दर्शनासाठी गेलो. मंदिरात पोहचण्याकरिता १ किलोमीटर खाली उतरून जावे लागते. पादत्राणे काढून ठेवण्याकरिता सोय केलेली आहे, पादत्राणे काढली आणि जवळील असलेल्या एका नळाखाली हात पाय स्वछ धुतले. मंदिर अलकनंदा नदीच्या मध्यभागी असल्या कारणाने, पुलावरून मंदिर परिसरात जाणून, देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो.  दर्शनासाठी रांगेत उभे असते वेळी, तेथील एका सुरक्षा रक्षकाने अचानक आम्हाला पुढे बोलावून घेतले आणि नवीन रांग तयार करत थेट मंदिरात प्रवेश दिला. देवीची मूर्ती (मुख) काळ्या पाषाणातील रेखीव व सुरेख आहे. मंदिराच्या छपराची व्यवस्था अशाप्रकारे केली आहे कि, सूर्याची किरणे सतत देवीच्या मुखावर पडत राहतील. देवीचे दर्शन घेतले आणि काही वेळ मंदिरातच बसून राहिलो.

धारी देवी मंदिर
धारी देवी मंदिर

    मंदिरातून बाहेर येत, पादत्रणे स्टॅन्डजवळील ठेवलेले पादत्राणे घेतली आणि शेजारील असलेल्या ब्रिजवर जाऊन फोटो काढले. ट्राफिक मध्ये अडकलेल्या दोन गाड्या नुकत्याच मंदिराजवळ पोचल्याचे विजयला निरोप आला होता. दर्शनाकरिता रांग मोठी अलसल्याकारणाने त्यांना वेळ लागणार होता, म्हणून आम्ही जवळील एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये जेवायचे ठरवले.  जेवणकरून आम्ही एक किलोमीटर वर चढून गाडी जवळ आलो तोवर सर्वांचे, देवीचे दर्शन घेऊन झाले होते. अमेयाचे वडील गाडीजवळ काहीतरी शोधात आले, त्यांना विचारले असता त्यांनी हॅन्ड बॅग शोधात असल्याचे सांगितले. सर्व गाड्यांमध्ये शोधले पण हॅन्ड बॅग काही सापढली नाही, यावरून हॅन्ड बॅग लॉजवर विसरल्याचे सुनिश्चित झाले. काकांनी बॅग अमेयाकडे दिली होती, पण साहेब फोटो काढण्याच्या नादात गाडीत ठेवायचे विसरून गेले. ऑर्गनाईझर गौरव नेगी याला कळवले असता, त्याने निश्चिन्त राहण्यास सांगितले. मुंबईचे कोण्ही पर्यटक आल्यास त्यांच्याकडे हॅन्ड बॅग पाठवून देण्याचे आश्वासन दिले. विश्रांतीनंतर, सर्वजण ऋषिकेशच्या दिशेने निघालो. काही सदस्य जेवले नव्हते म्हणून, श्रीनगर मधील एका रेस्टॉरंट जवळ जेवायला थांबलो. जेऊन झाल्यावर प्रवास सुरु झाला ऋषिकेशच्या दिशेने, सायंकाळी ७:०० ची गंगा आरती पाहण्याचा बेत होता. गंगा आरती पाहायला मिळावी म्हणून तीनही गाड्या सुसाट पळत होत्या. ड्रायव्हरची नजर, स्टेरिंगवरील कंट्रोल अप्रतिम होते. बऱ्याच ठिकाणी ट्राफिक जॅम झाले होते. ऋषिकेश मधील हरिद्वार रोड तर गाड्यांनी गच्च भरला होता, पण ड्राइवर ने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आणि आम्हाला ठीक ६:५० ला त्रिवेणी घाट जवळ सोडले. हरिद्वार रोड पासून त्रिवेणी घाट ५०० ते ६०० मीटर अंतरावर आहे. आम्ही धावत धावत तिथे पोहचलो. 

त्रिवेणी घाट प्रवेश द्वार
त्रिवेणी घाट प्रवेश द्वार
त्रिवेणी घाट आरती स्थळ
त्रिवेणी घाट आरती स्थळ

    सर्व प्रथम अमेय आणि माझी प्रतीक्षा करत थांबलेल्या कामावरील सहकर्मी निटूराम सैनी याची भेट घेतली. तो मुझफ्फरनगरहुन १०० किलोमीटर प्रवासकरून आम्हाला भेटण्या करीत आला होता. मित्राची भेट घेऊन, गंगा आरती पाहण्या करीत गेलो. सर्व सीट्स फुल झाल्या होत्या, म्हणून स्टँडच्या दुसऱ्या बाजूस जाऊन उभाराहीलॊ. आमच्या सोबतच्या दोन गाड्या, काही अपरिहार्य कारणांमुळे थांबल्या कारणाने त्यांना यायला उशीर झाला व त्या गाड्यांतील सर्व सदस्य गंगा आरतीला मुकले. सर्वप्रथम धूप आरती झाली, नंतर दीप आरतीला सुरुवात झाली. जवळ जवळ अर्धा तास आरती चालू होती. इतर दोन गाड्यांतील सदस्य देखील त्रिवेणी घाटावर पोहचले होते. गंगेत दीप सोडले आणि निटूरम सोबत गप्पा मारत वेळ घालवला. ऋषिकेश मध्ये शॉपिंग करायची होती, पण इतक्या दूरहून भेटायला आलेल्या मित्राला वेळ देणेही तितकेच महत्वाचे होते. अमेय आणि मी, निटूरम सोबत गप्पा मारत व्यस्त होतो तोवर इतर सदस्य गंगेत डुबकी मारून आपले पाप धुवत होते. मी पाप केले नव्हते म्हणून, मी काही गंगेत डुबकी मारली नाही 😂😂. 

मी, निटूराम, अमेय - त्रिवेणी घाट
मी, निटूराम, अमेय - त्रिवेणी घाट

    सर्वांचे गंगेत डुबकी मारून झाले होते, आमचे ही मित्रासोबतच्या गप्पा संपल्या, मित्राला निरोप दिला आणि आम्ही निघालो हरिद्वार रोडच्या दिशेने, कारण तिथे आमच्या गाड्या येणार होत्या. तेथे जातेवेळी मराठी सिने कलाकार "अमोल कोल्हे" यांच्याशी भेट झाली, त्यांना हात मिळवून अभिवादन केले आणि पुढे निघालो. काही वेळातच गाड्या आल्या, राहुल आणि प्रदीप यांच्या सुट्या संपल्या नव्हत्या, ते अजून फिरणार असल्याकारणाने तिथेच थांबले. त्यांना निरोप दिला आणि आमचा प्रवास सुरु झाला साहारनपूरच्या दिशेने. रात्री १२:१५ ला मुंबईला जाणारी ट्रेन (गोल्डन टेम्पल) साहारनपूर वरून पकडायची होती. ट्राफिक असल्या कारणाने साहारनपूरला उशिरा पोहचण्याचा अंदाज वाटू लागला, ड्रायव्हरने पुन्हा गाड्या सुसाट पळवल्या आणि ११:४० ला आम्हाला साहारनपूरला सोढले. टीप: वयक्तिक रित्या मला साहारनपूर जंक्शन सुरक्षित वाटले नाही, नवख्या व्यक्तीला तसेच स्त्रियांकरिता असुरक्षित असल्याचे जाणवले. स्टेशनच्या बाहेरील परिसरात एकटे न फिरणेच योग्य.  परतीच्या प्रवासावेळीसुद्धा आमच्या सीट्स कन्फर्म नव्हत्या, सर्व सीट्स RAC होत्या. ट्रेन, ३ नंबर फलाटावर येणार होती, जड बॅगा घेऊन चालत जाण्यापेक्षा सर्वांच्या बॅगा हमालाकडे देण्याचा निर्णय अमेयच्या वडिलांनी घेतला. सुरुवातीला हा निर्णय वायफळ वाटत होता पण, ट्रेन फक्त ५ मिनटे थांबत असल्या करणारे, सामान घेऊन फटाफट चढणे सर्वांना जमले नसते व ट्रेन सुटली असती. रात्री १२:१५ वाजता ट्रेन आली आणि आम्ही सर्वजण ट्रेन मध्ये वेगवेगळ्या बोगीमध्ये चढलो. हमालाने फटाफट बॅगा ट्रेन मध्ये चढवले आणि हमालाकडे बॅगा देण्याचा निर्णय योग्य वाटू लागला. 

    सर्वजण वेगवेगळ्या बोगी मधून चढले असल्या कारणाने, सीट शोधण्याचा कार्यक्रम सुरु झाला 😆. आम्ही (मी, कौशल आणि अमेयाचे वडील) आमच्या सीट जवळ गेलो असता, एक स्थूल व्यक्ती सीट वर झोपली होती. त्या काकांना उठायला सांगितले असता उठायला तयार नाहीत, टी.सी ने माझी तिकीट तपासली आहे, तुम्ही तुमची तिकीट दाखवा सांगू लागले. त्याला आमची तिकीट दाखवली आणि आवाज चढवत नियमही शिकवले. नंतर तो वरिष्ठ नागरिक असल्याचे कारणे देऊन आम्हाला वरच्या सीट वर जा म्हणून सांगू लागला. पण आता वेळ निघून गेली होती, सुरवातीलाच मनमानी न करता विनंती केली असती तर सीट बदलण्याचा विचारही केला असता. अखेरीस त्याला उठवले आणि कौशल आणि मी RAC असलेल्स्या सीट वर बसलो व त्या स्थूल व्यक्तीला वरच्या सीट वर जाण्यास भाग पाडले. त्याच्या सोबत असलेली व्यक्ती पण शहाणपणा करू लागली होती, पण मीच आवरत घेतलं कारण सहा दिवस मजेत गेले होते आता शेवटच्या दिवशी वाद घालून मूड खराब करायचा नव्हता. या सर्व गडबडीत जेवायचे राहूनच गेले होते आणि मला तापही आला होता. विजय ने आणलेली पोळी भाजी खाल्ली आणि तापवरचे औषधे घेऊन झोपी गेलो. विशेष म्हणजे यावेळी गाडीमध्ये बऱ्याच सीट रिकामी होत्या. काही प्रवासी पुढील स्थानकातून चढणार होते, त्यामुळे हाऊस कीपिंग वाल्याने आमच्या समूहातील काही सदस्यांना त्या सीट्स वर जाणून झोपायला सांगितले. या मुळे एका सीट वर दोघांना ऍडजस्टमेन्ट करून झोपायची वेळ आली नाही. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा

दिवस सातवा

    प्रवासाचा शेवटचा दिवस, २७ मे सकाळी ८ वाजता जाग आली. फ्रेश झालो आणि चहा घेतला. बाहेरील दृश्य पाहत सीटवर बसून होतो, इतक्यात अभिषेक आला, त्याची झोप पूर्ण न झाल्याचे जाणवले. त्याला सीटवर झोपायला दिले आणि मी जवळच्या सीट वर जाऊन ज्योत्स्ना सोबत गप्पा मारत बसलो. थोड्यावेळाने अमेय पण आला आणि आमच्या गप्पा रंगल्या. काही वेळांनी इतर सदस्यही जागे झाले आणि उनो खेळायचे सत्र सुरु झाले 😄. दुपारचे जेवण ऑनलाईन ऑर्डर केले होते. दुपारी १४:१५ ला रतलामला गाडी थांबली आणि विजयने जाऊन जेवण आणले. पोटभर जेवल्यानंर पुन्हा उनो खेळायला सुरुवात केली ते थेट नालासोपारा येईपर्यंत. रात्री १०:४५ ला ट्रेन बोरिवली स्थानकात पोहचली आणि मी, प्रसाद आणि प्रणाली उतरलो, बाकी सर्व सदस्य मुंबई सेन्ट्रलला उतरले. अंदाजे रात्री ११:१५ वाजता मी गोरेगावला घरी पोहचलो. 

    सात दिवस मजा केली, देव दर्शनही झाले. हे सात दिवस कधी संपले कळलेच नाही, सात दिवसांची सुट्टी एका दिवसात संपली असे वाटू लागले, याचे कारण म्हणजे समूहातील सर्व सदस्यांचे गोड स्वभाव. एखाद्या समुहा बरोबर सहलीला जाते वेळी, समूहातील अनोळखी सदस्य कसे असतील, त्यांचे स्वभाव कसे असतील असा विचार प्रत्येकाच्या मनात असतो. पण या समूहातील सर्वच सदस्य मनमिळाऊ असल्या कारणाने सात दिवसांचा प्रवास सुखकर व आनंदी झाला. समूहातील सर्व सदस्यांचे खूप खूप आभार तसेच ऑर्गनाईझर विजय सुतार आणि उत्तराखंडातील ऑर्गनाईझर गौरव नेगी यांचे विशेष आभार. तसेच उनो या खेळाने एकमेकांशी ओळख करून दिल्या बद्दल उनोचेही विशेष आभार 😀

अरे हो! अमेय विपटच्या हॅन्ड बॅग बद्दल सांगायचे राहूनच गेले. गौरव नेगी यांनी, आलेल्या काही मुंबईच्या पर्यटकांसोबत हॅन्ड बॅग पाठवून दिली व ३१ मे रोजी अमेयला मिळाली.


खर्चाचा तपशील






वेळेचा तपशील



केदारनाथ, तुंगनाथ ट्रेक आणि धार्मिक यात्रा - भाग १

    
प्रवासाची तारीख: २१ मे ते २७ मे, २०२५ 
वाहतुकीची पद्धत: 
ट्रेन आणि खाजगी वाहन
 

    केदारनाथ शब्द हा "केदार" आणि "नाथ" या दोन संस्कृत शब्दांपासून बनला आहे. "केदार" म्हणजे "प्रदेश" किंवा "भूमी", तर "नाथ" म्हणजे "स्वामी" किंवा "देव". म्हणून, केदारनाथचा अर्थ "प्रदेशाचा स्वामी" किंवा "भूमीचा देव" असा होतो. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात स्थित आहे. ते चोराबारी हिमनदीजवळ गढवाल हिमालयात ३५८६ मीटर उंचीवर आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि सर्वात अवघड ठिकाणी वसलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आणि वर्षातील फक्त ६ ते ७ महिने (अक्षय तृतीया ते कार्तिकी पौर्णिमा) या कालावधी करिता भक्तांसाठी मंदिर खुले असते. 

केदारनाथ मंदिर
श्री केदारनाथ मंदिर 


पंच केदारांचा परिचय


    हिंदू पौराणिक कथेनुसार, कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर, जेव्हा पांडव भ्रातृहत्येच्या दोषाखाली दबले गेले होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाचा शोध घेतला. तथापि, शिव त्यांच्या कृत्यांवर खूश नव्हते आणि वारंवार बैलाचे रूप धारण करून त्यांच्यापासून वाचले. एके दिवशी, पाच पांडव बंधूंपैकी भीम, बैलाच्या रूपात शिवाला ओळखण्यात यशस्वी झाला. पकडले जाण्याच्या भीतीने, शिवाने जमिनीत उडी मारून अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. तरीही, असे करताना, त्याने आपला कुबडा उघडा ठेवला. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा आता केदारनाथ मंदिर म्हणून पूजली जाते. मंदिरात आजही पूजनीय असलेले शिवलिंग कुबड्याच्या शंकूच्या आकाराच्या बाहेरील भागासारखे दिसते, इतर शिव मंदिरांमध्ये पूजा केल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या नेहमीच्या स्वरूपापेक्षा वेगळे.

    कुबड्याशिवाय, बैलाचे इतर चार भाग नंतर वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागले, ते सर्व भारतीय हिमालयातील गढवाल प्रदेशात - तुंगनाथ येथे हात दिसले, मध्यमहेश्वर येथे नाभी दिसली, रुद्रनाथ येथे शिवाचे मुख दिसले आणि कल्पेश्वर हे त्याचे डोके आणि केस दिसले. पांडवांनी या सर्व ठिकाणी मंदिरे बांधली, जी नंतर एकत्रितपणे पंच केदार म्हणून ओळखली जाऊ लागली. छोटा चार धाम यात्रेसह भगवान शिवाचे अनेक भक्त शाश्वत आशीर्वाद आणि मोक्षाचा मार्ग शोधण्यासाठी पंच केदार यात्रा देखील करतात.





पूर्वतयारी


    केदारनाथ ज्योतिर्लिंग हिमालय पर्वतरांगेत वसलेले असल्या कारणाने, तेथील वातावरण सुंदर व मनमोहक आहे, यामुळे आपसूकच या जागेला भेट देण्याची ओढ निर्माण होते. गेल्या तीन वर्षांपासून केदारनाथला जाण्याची इच्छा मनी बाळगून होतो, पण काही अपरिहार्य कारणांमुळे जाणे होत नव्हते किव्हा टाळावे लागत होते. याही वर्षी ट्रेक ऑर्गनाईझर श्री विजय सुतार (दूरध्वनी क्रमांक ८१४९५३३१६८, इव्हेंट ग्रुप - भटकंती ध्यास गडकिल्ल्यांचा)  याने व्हाट्सअप स्टेटसला केदारनाथ - तुंगनाथ सहलीची जाहिरात टाकली होती, याही वर्षी आपल्याला जाता येणार नाही असे समजून जाहिरातींकडे दुर्लक्ष केले होते इतक्यातच सहकर्मी अमेय विपट यांनी विजय सुतार याने केलेली जाहिरात फॉरवर्ड करत केदारनाथला जायचे का विचारले. अप्रत्यक्षपणे केदार बाबानेच बोलावणे पाठवले होते! लगेच अमेयला कॉल करून चर्चा केली आणि या वर्षी केदारनाथला जायचे ठरले, पण प्रश्न होता सुट्यांचा, दुसऱ्याचदिवशी ऑफिस मध्ये जाऊन मॅनेजर समोर थान मांडून बसलो आणि दोंघांसाठी सुट्या मंजूर करून घेतल्या. परम मित्र कौशल सुतार यालाही विचारले असता, त्याने "हो जाऊया" असे उत्तर दिले होते, पण नेहमीप्रमाणे हा टांग देणार असे गृहीत धरले होते. यावेळी मात्र पठ्ठ्ट्याने बायकोकडून परवानगी मिळवली आणि यात्रेची तयारी केली 😂. सहकर्मी अमेय सोबत अजून एक सहकर्मी संतोषराज करंडे सुद्धा येण्यास तयार झाला, संतोषराज ने सुचवले कि आपण आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन जाऊया, त्यानुसार आम्ही सर्वांनी तयारीला सुरवात केली. केदारनाथ व तुंगनाथ दोनीही तीर्थक्षेत्र उंचावरील असल्या कारणाने तेथील प्राणवायूची मात्रा फार कमी असते, आई वडिलांचे वय आणि तब्बेत पाहता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक होते. डॉक्टरांनी यात्रेसाठी दोघेही अनफिट असल्याचे सांगितले, हे ऐकून मन निराश झाले. ऑर्गनाईझर विजय सुतार यांनी १० मार्च ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख दिली होती, दिवस फार कमी उरले होते त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे होते. विजयशी चर्चा करून हेलिकॉप्टरच्या पर्यायी विषयी चर्चा केली, पण वर पोहचल्यावर काही त्रास झाल्यास, त्वरित उपचार मिळणे अवघड असल्याचे कळले. डॉक्टरांच्या सल्याचा मान ठेवत आई वडिलांशिवाय यात्रा करायची ठरवले. दुसरीकडे अमेयने सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेतला व डॉक्टरांकडून आई वडिलांना घेऊन जाण्यास ग्रीन सिग्नल मिळाले.  

    १० मार्चला आम्ही सर्वांनी रुपये ५ हजार भरून यात्रेसाठी आमची जागा सुनिश्चित केली, यात्रेची तारीख २१ मे होती, अंदाजे अडीच महिने होते तयारी व शॉपिंग करिता, पण ६ दिवसांचा प्रवास आणि २५ किलोमीटरचा ट्रेक आणि हिमालय पर्वतरांगेतील थंड वातावरण यामुळे कोणते सामान घ्यावे, किती घ्यावे आणि कोणते नाही हे सुचत नव्हते, मेंदू गारठला होता. अशावेळेला मित्रच कामाला येतात, शैलेश दादाने यात बरीच मदद केली. बॅगेचे वजन कमी कसे ठेवता येईल, कोणती वस्तू घेणे आवश्यक आहे ही सर्व माहिती त्याने दिली. शैलेश दादाला हिमाचल प्रदेशातील गिर्यारोहण प्रशिक्षणाचा अनुभव असल्या कारणाने त्याने दिलेली माहिती व सल्ले मोलाचे होते. वायफळ खर्च होऊनये म्हणून त्याने त्यांच्याकडचे बहुतेक ट्रेकिंगचे सामान मला दिले. तसेच रेल्वेवाले परब काकांनी त्यांचा पॉन्चो दिला, ज्यामुळे माझ्यासोबत माझी पूर्ण बॅग पण झाकली जात होती, त्यामुळे पावसात बॅगेतील सामान भिजण्याची चिंता मिटली. डिकॅथलॉनला जाऊन हेड टॉर्च, वूलन सॉक्स आणि ग्लोव्स खरेदी केले. २० मार्चला विजयने कॉल करून वयक्तिक माहिती घेतली आणि ट्रेन बुकिंग व उत्तराखंड टुरिझम बोर्डचे यात्रा रजिस्ट्रेशन पूर्ण केले. जसजशी तारीख जवळ येतहोती तसतशी उत्सुकता वाढत होती. एक महिना शिल्लक असताना संतोषराजने निराशाजनक माहिती दिली कि, अचानक वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे त्याचे येणे रद्द होत आहे, इतकेच नव्हे तर विजयने सुद्धा धक्कादायक माहिती दिली होती ती म्हणजे हॅलिकॉप्टरचे बुकिंग फुल्ल झाले आहे, म्हणजे ग्रुप मधील वरिष्ठ नागरिकांना पालखी (डोली) हा एकच पर्याय उपलब्ध राहिला होता. गोष्टी इतक्यावरच थांबल्या नाहीत, २२ एप्रिलला झालेल्या दहशदवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून ६ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशदवादी ठिकाणांवर हल्ला केला आणि अघोषित युद्धाला सुरवात झाली. जवळच्या लोकांनपैकी बरेचजण आपआपल्या परीने सल्ले देऊ लागले. "युद्ध सुरु आहे नका जाऊ, रिस्क नका घेऊ, वगैरे वगैरे", पण मी आणि अमेय आमच्या मताशी ठाम होतो, जोवर उत्तराखंड सरकार आणि ऑर्गनाईझर विजय सुतार "यात्रा रद्द" सांगत नाही तोवर आपण आपली तयारी चालू ठेवायची "दि प्लॅन इस ऑन". देवाच्या आणि भारतीय सशस्त्र सेनेच्या कृपेने युद्ध थांबले आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला ज


महत्वाच्या सूचना


  • केदारनाथ ट्रेक करिता, बॅगेचे वजन जितके कमी ठेवता येईल तितके कमी ठेवावे. महत्वाची औषधे, थर्मल, रेनकोट, गरम जॅकेट, एक एक्सट्रा जोड कपडे (ड्राय फिट), अतिरिक्त मौजे, हेड टॉर्च, पॉवर बँक, इतके सामान पुरेसे आहे. 
  • महत्वाची औषधे जसे कि (ताप, सर्दी, उलटी व जुलाब यांच्यावरील औषधे आणि इलेक्ट्रॉल / एनर्झल पावडर) सोबत ठेवावीत.
  • पालखी करिता सरकारी दर सकाळी ४ ते १० वाजेपर्यंत असतात, १० नंतर जास्तीचे दर आकारले जातात.
  • केदारनाथ ट्रेक करिता, सोनप्रयागच्या पुढे गाडी घेऊनजाण्यास परवानगी नाही.
  • गर्दी जास्त असल्यास, सोनप्रयागला रजिस्ट्रेशन तपासणी करिता रांगेत ३-४ तास लागू शकतात.
  • गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर ट्रेक करिता १० ते १२ तास लागतात, त्यानुसार तयारी करून जाणे.
  • केदारनाथ ट्रेक मधील किलोमीटर फलकांवर विश्वास ठेऊ नये, सर्व किलोमीटर चुकीचे लिहलेले आहेत. गूगल बाबा सुद्धा चुकीचे किलोमीटर दाखवते २३ किलोमीटर ऐवजी १५ किलोमीटर दाखवते.



प्रवासवर्णन 


दिवस पहिला

    २१ मे चा दिवस उजाडला, पण माझी पहाट काही झाली नव्हती. एक आठवडा नाईट शिफ्ट केल्या असल्याने सायकल ब्रेक झाले नव्हते, अदल्यारात्री ४ वाजे पर्यंत घुबडासारखा जागा राहिलो होतो. आईने सकाळी ९:३० वाजता उठवले. फटाफट तयार झालो, आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि सकाळी ११:३० वाजता घरातून निघालो. ऑटो रिक्षाने गोरेगाव स्टेशनला पोहचलो आणि तेथून लोकल ट्रेन ने सुमारे दुपारी १२:२० ला बोरिवली स्थानकात पोहचलो. हरिद्वार सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन बांद्रा टर्मिनसहून दुपारी १२:४५ ला सुटणार होती, एकूण १८ सदस्यांनपैकी १५ सदस्य बांद्रा टर्मिनस हुन ट्रेन मध्ये चढणार होते तर मी आणि अजून दोन सदस्य बोरिवली हुन ट्रेन पकडणार होतो. ट्रेनची वाट पाहत असताना, विजयला कॉल केला आणि बोगी नंबर व सीट नंबर विचारला तेव्हा कळले सीट्स कन्फर्म नाहीत, RAC आहेत. २५ तासांचा प्रवास RAC ने कसा करायचा हा विचार पडला होता, पण आता वेळ निघून गेली होती, जो होगा देखा जायेगा म्हणत मनाची तयारी केली. प्रवास म्हटलं की अश्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. ट्रेन दुपारी १ वाजून २५ मिनिटाला बोरिवली स्थानकात पोहचली आणि मी ट्रेन मध्ये चढलो व आमचा प्रवास हरिद्वारच्या दिशेने सुरु झाला. जवळ जवळ दीड वर्षांनी कौशलशी भेट झाली होती, त्याच्या सोबत बराचवेळ गप्पा मारत बसलो. अमेयच्या आई वडिलांशीही भेट पहिल्यांदाच झाली होती. बरेचसे सदस्य माझ्या करीत अनोळखी होते, वेगवेगळ्या बोगीत असल्या कारणाने त्यांच्याशी ओळख झाली न्हवती. सकाळी निघतेवेळीच जेवण करून गिघालो होतो, भूक लागली नसल्याकारणाने दुपारी ट्रेन मध्ये जेवलो नाही. काही वेळा नंतर काही सदस्य उनो खेळायला लागले, कौशल सोबतच्या गप्पा संपवल्या आणि आम्ही दोघे त्यांच्यासोबत उनो खेळायला सामील झालो. पहिल्यांदाच उनो खेळत असल्याने नियम कळत नव्हते आणि आपला गेम झाला, एकूण १२ पत्ते मला घ्यावे लागले. रात्री जेवणाकरिता, ट्रेन मधेच पुलाव मागवला तसेच कौशलने घरून भाजी चपाती आणली होती. माझी आवडती मटकीची भाजी आणली होती, मग काय २-३ चपात्या आणि भाजी घेतली त्याच्याकडून. विशेष म्हणजे कौशल कोल्हापूरचा, त्यामुळे जेवण तिखट असणे स्वाभाविकच, पण इथे मात्र उलट झाले भाजीची चव अस्सल कोकणी जशी आई बनवते तशीच. जेवण पूर्ण केले आणि पुन्हा उनो खेळायला सुरुवात केली. अशाप्रकारे उनो खेळता खेळता सर्वांशी ओळखही झाली आणि पहिला दिवस मावळला. रात्री झोपायची वेळ आली तेव्हा पुन्हा तोच प्रश्न उद्भवला, एका सीट वर दोन जण कसे मावणार? मग काय "जिंदगीका दुसरा नाम एडजस्टमेन्ट" म्हणत झालो एका सीट वर दोघे एड्जस्ट. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा




दिवस दुसरा  

    सकाळी ७:०० वाजताच जाग आली, फ्रेश झालो आणि चहा प्यायलो. जबरदस्त भूक लागली होती, ट्रेन मध्ये नाश्ता घेऊन कोणीतरी फिरकेल असे वाटले होते, पण चहा आणि कोल्ड्रिंक्स वाल्या शिवाय कोणी आलेच नाही. फरिदाबाद स्टेशन व हजरत निजामुद्दीन जंक्शनला ट्रेन थांबली पण नाश्तावाला काही आला नाही. टपरी जंक्शनला तर गाडी २० मिनिटे थांबली, आम्ही प्लॅटफॉर्म वर उतरून कुठे काही नाष्टा मिळतो का पाहत टपरी जंक्शन वर छपरी सारखे फिरत होतो पण कोल्ड्रिंक आणि चिप्स सोडून दुसर काहीच सापडले नाही. एवढे दळिद्री जंक्शन पहिल्यांदाच पहिले होते. चिप्स आणि स्लाइस केक खाऊन पोटपूजा केली आणि पुन्हा उनो खेळण्यात व्यस्त झालो ते दुपारी २ वाजे पर्यंत. दुपारी २:३० ला गाडी हरिद्वारला ऑन टाइम पोहचली. ट्रेन ऑन टाइम पोहचलेली पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. आजवर भारतीय रेल्वेने कधीच वेळेवर पोहचवले नाही, हाच अनुभव होता. असो भारतीय रेल्वेत होणारी सुधारणा पाहून बरे वाटले (अच्छे दिन आगये 😜).

    हरिद्वार स्थानका बाहेर आलो, ग्रुप फोटो काढले आणि गाडीत जाऊन बसलो. १८ सदस्यांसाठी ३ गाड्या होत्या, प्रत्येक गाडीत ६ जण, अशी व्यवस्तिथ व्यवस्था केली होती. हरिद्वार स्थानकाच्या काही अंतर पुढे आलो आणि खांड गाव जवळील "रसोई ढाबा" येथे दुपारी ३:१५ ला जेवायला थांबलो. कौशल आणि मी स्पेशल थाळी ऑर्डर केली होती, कॉन्टिटी किती असेल याचा काही अंदाज नव्हता. वेटर थाळी घेऊन आला, थाळीमधील ६ नान पाहून माझी हवाच गुल झाली, विजय आणि प्रसादला एक एक नान शेर करून कशीबशी थाळी संपवली. पोट गच्च भरल होत, तरी पण थाळीत असणाऱ्या गोंडस गुलाबजामसाठी पोटात छोटीशी जागा शिल्लक होती, तो फस्त केला आणि सायंकाळी ४:३० च्या दरम्यान प्रवास सुरु केला तो चंद्रपुरीच्या दिशेने. 

ग्रुप फोटो - हरिद्वार
ग्रुप फोटो - हरिद्वार
डावीकडून उजवीकडे
पहिली लाईन - निशिकांत, मी, प्रदीप, अमेयचे वडील व आई, ज्योत्स्ना, स्नेहलची आई,
स्नेहल, अभषेकची पत्नी.
मागील लाईन - सागर, प्रज्वल, कौशल, अभिषेक, अमेय, प्रसाद, प्रणाली.

    उत्तराखंड सरकारने रस्ते मोठे व वेवस्तीथ बनवले असल्या कारणाने गाडी सुसाट पळत होती, "काय झाडी काय डोंगार" पाहत आमचा प्रवास चंद्रपुरीच्या दिशेने सुरु होता. सायंकाळी ६:४० च्या दरम्यान आम्ही "देवप्रयागला" पोहचलो, भागीरथी आणि अलकनंदा नद्यांचा संगम पाहिला. तेथील असणाऱ्या "सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीने" माझे लक्ष वेधून घेतले.  ड्राइवर कडून या विषयी थोडी माहिती घेतली. भागीरथी अलकनंदा नद्यांचा संगमाजवळ काही फोटो आणि सेल्फी काढले. सायंकाळी ७:१० ला पुन्हा प्रवास सुरूझाला चंद्रपुरीच्या दिशेने. आतापर्यंत साडेचार तासांचा प्रवास झाला होता, गाडीत बसून थोडी झोप काढली. सर्वांनाच चहाची तलब लागली होती. विजयने ड्रायव्हरला चहासाठी गाडी थांबवायला सांगितली. ड्राइवर काही गाडी थांबवत नव्हता, चायवाला थोडी दुरीपे है, अभि आया, असं करत अर्धा तास झाला पण चहा साठी काही गाडी थांबवत नव्हता. अखेरीस त्याला विचारले, आपक चाय वाला और कितना दूर है? त्याने हसत हसत सांगितले, "शेहर मी गाडी रोकूनगा तो ट्राफिक जॅम हो जायेगा". शेहर के बाहेर निकलतेही चाय के लिये गाडी रुकाताहू हू. अखेरीस आम्ही शहारा बाहेर आलो आणि ड्रायव्हरने गाडी चहा करीत रात्री ८:३० वाजता थांबवली. चहा पिऊन तरतरीत झालो, पाय मोकळे केले आणि ९:१५ वाजता चंद्रपुरीच्या दिशेने प्रस्थान केले. अंदाजे रात्री ११:०० वाजता आम्ही चंद्रपुरीला "शिखर लॉज" ला पोहचलो. चेक इन केले, फ्रेश झालो आणि थोडी पोटपूजा करून घेतली. विजयने सर्वाना सकाळी ६:०० वाजता निघायचे आहे अशी सूचना दिली होती. झोपण्या आधी केदारनाथ ट्रेक साठी लागणाऱ्या सामानाची बॅग तयार करून ठेवली आणि सकाळी ४:३० चा गजर लावून झोपलो. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा

देवप्रयाग - भागीरथी आणि अलकनंदा संगम
देवप्रयाग - भागीरथी आणि अलकनंदा संगम 
सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी - देवप्रयाग
सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी - देवप्रयाग


दिवस तिसरा  

    ज्या दिवसाची इतकी वर्ष प्रतीक्षा करत होतो, अखेर तो दिवस उजाडला २३ मे २०२५. सकाळी ४:३० चा गजर झाला आणि आम्ही तयारीला लागलो. २५ किलोमीटरचा ट्रेक आणि महादेवाचे दर्शन ह्या दोनच गोष्टी डोक्या घोळत होत्या. न्याहारी गौरीकुंडला जाऊन करायचे असे ठरवून, ठीक सकाळी ६:३० वाजता सोनप्रयागच्या दिशेने आम्ही निघालो. सुमारे ८:३० च्या दरम्यान आम्ही सोनप्रयागजवळ पोहचलो, ट्रॅफिक जॅम असल्या कारणाने, काही अंतर अलीकडेच गाडीतून उतरलो आणि चालायला सुरवात केली. (चार वर्षां पूर्वी थेट गौरीकुंडला गाडीने जाता येत होते, पण भाविकांची आणि पर्यटकांची वाढती गर्दी पाहता, उत्तराखंड सरकाने सोनप्रयागला चेकपॉईंट बनवून सर्व गाड्या तिथेच पार्क करायला सुरुवात केली आहे). काही अंतर पुढे चालत गेलो आणि रेजिस्ट्रेशन तपासणी करिता रांगेत उभे राहिलो. तब्बल तासाभरानंतर आमचा नंबर आला. सुरक्षारक्षकाने रेजिस्ट्रेशन फॉर्म वरील QR कोडे स्कॅन केला आणि पुढे जाण्यास परवानगी दिली. 

    आम्हाला वाटले, आता ट्रेक ला सुरुवात झाली, पण तस नव्हत. पुढे जाऊन अजून एका रांगेत उभे राहावे लागले, ते म्हणजे सोनप्रयाग ते गौरीकुंड शटल सेवा करिता. उत्तराखंड सरकारने गर्दीचे नियोजन करण्या करीत केलेले प्रयोजन. वासुकीगंगा नदीचा पूल ओलांडला आणि आम्ही टॅक्सी स्टॅन्ड जवळ पोहचलो. अंदाजे ४०-४५ मिनिटांनी आमचा नंबर आला. माणशी ५० रुपये देऊन आम्ही गौरीकुंड करिता निघालो. टीप: जोवर गाडीत दहा सदस्य होत नाहीत तोवर गाडी सोडत नाहीत. सोनप्रयाग टॅक्सी स्टॅन्ड ते गौरीकुंड ४.२ किलोमीटर अंतर आहे, रस्ता अरुंद असल्याकारणाने इथे सुद्धा ट्राफिक जॅम झाले होते. अखेर एक किलोमीटर आधीच गाडीतून उतरून पायी चालायला सुरवात केली.

शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग
शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग 
शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग
शटल करीत रांगेत उभे असताना - सोनप्रयाग 

    काही अंतर पुढे चालत गेल्यावर, एका स्टॉल जवळ थांबुन न्ह्यारी केली. पोटपूजा करून पुढे निघालो आणि पुढे खेचरं (खच्चर) आणि पालखी (डोली) वाले भेटले. पालखीचे भाडे १५००० ऐकून पायाखालची जमीनच सरकली. पालखीच्या भाडे संदर्भात घासाघीस सुरु झाली, काही वेळ तिथे उभे राहिल्या वर, मी विजयला सांगितले कि आम्ही (मी, कौशल, प्रज्वल) पुढे जातो. आम्ही अंदाजे दुपारी १२:०० वाजता ट्रेकला सुरुवात केली होती. टीप : पालखी (डोली) करीत सरकारी दर सकाळी ४ ते १० वाजपर्यंत असतात, १० नंतर खाजगी (जास्तीचे) दर आकारले जातात. वरिष्ठ नागरिकांना पालखी करून दिल्या शिवाय विजयला पुढे जाणे शक्य नव्हते, तसेच अमेयचे आई वडील सुद्धा पालखीने जाणार होते म्हणून दोघे पालखीची सोय होईपर्यंत मागेच थांबले. इतर मंडळी हळू हळू पुढे गेली. ट्रेकच्या सुरुवातीला सर्वजण चालत जाऊ असे एका सुरात बोलत होते. काही मंडळींनी २-३ किलोमीटर नंतरच हार मानली आणि गुपचप खेचरावर बसून पुढे निघून गेले 😆. 

    वाटेत भैरवनाथाचे मंदिर लागते, भैरवनाथाला नमस्कार करून आम्ही पुढे गेलो आणि काहीवेळ विश्रांतीकरिता थांबलो. आम्हाला वाटले होते विजय आणि अमेय आमच्या मागोमाग असतील, दोघांचा चालायचा वेग आणि स्टॅमिना पाहता ते आम्हाला गाठतील अशी आशंका होती. विजयला दुपारी १:५० ला कॉल केला तेव्हा कळले की, त्यांनी नुकताच ट्रेक चालू केला आहे. पालखीचे भाडे ठरवण्यात जवळ जवळ डिड तास वाया गेला होता. विश्रांती करून आम्ही पुढे प्रस्थान केले, अजून बराच पल्ला गाठायचा होता. पाण्याच्या बाटलीत पाणी काही राहत नव्हते, प्रत्येक बिसलरी बॉटल साठी ५० रुपये मोजावे लागत होते. बर्फ वितळून पर्वतावरून यणारे पाणी जागोजागी पाईप द्वारे सोडले होते. तेच पाणी बॉटल मध्ये भरून पिऊ लागलो, यामुळे दोन गोष्टी झाल्या पैसेही वाचले आणि प्लास्टिकचे प्रदूषणही टाळता आले. (हिमालयन वॉटर आम्ही फुकट मध्ये पीत होतो 😁).


    अंदाजे आतापर्यंत ७ किलोमीटर चालणे झाले होते, दुपारचे ३:३० वाजले होते. विश्रांती साठी थांबलेलो असताना प्रज्वल आणि कौशल ने बॅगा पिट्टू (हमाल) कडे देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मनाविरुद्ध असला तरी, आता पर्याय नव्हता, शरीर खूप थकले होते. आम्ही तिघांनीही बॅगा पिट्टू कडे दिल्या आणि ट्रेक चालू ठेवला. पिट्टू आमच्या सोबतच चालत होता, आम्ही मात्र विश्रांती घेत फोटो काढत चालत होतो. त्यामुळे त्याला सुद्धा ओझं घेऊन आमच्या सोबत उभे राहावे लागत होते, म्हणून त्याच्या लिसेन्सचा फोटो घेतला, त्यात त्याचा फोन नंबर होता व त्याला पुढे निघून जायायला सांगितले. भीमबलीला पोहचल्यावर आम्ही जेवायचा निर्णय घेतला. सायंकाळी ४:०० ते ५:०० च्या दरम्यान जेवण पूर्ण करून पुन्हा ट्रेकला सुरवात केली. कौशलची भेट अमेय आणि विजयशी झाली, मी थोडा पुढे निघून गेलो असल्या कारणाने भेट झाली नव्हती, पण आम्ही सर्वजण जवळ पासच होतो, एकमेकांनमध्ये जास्त अंतर नव्हते. ८ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण झाला होता, आणि अजून १७ किलोमीटर बाकी होते. टीप : पायी मार्ग, खेचरं व पालखी मार्ग एकच असल्या कारणाने, खुप सावध राहावे लागते. खेचरं व पालखीची धडक झाल्यास गंभीर इजा होऊ शकते.

    मंदाकिनी नदीवरील पूल ओलांडून पलीकडच्या पर्वताकडे गेलो. प्रज्वल जेवला नसल्या कारणाने त्याचा थकवा अजून वाढला होता, तो जागो जागी विश्रांती साठी थांबू लागला, या मुळे आमचा (कौशल आणि मी) सुद्धा वेग मंदावला. मागून विजय आणि अमेय येतच होते, म्हणून प्रज्वलला मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मंदाकिनी नदी ओलांडल्या नंतरचा चढ हा तीव्र होता, त्यामुळे फारच दमछाक होत होती. कौशल आणि मी, आम्ही दोघ संगनमताने एक-एक टप्पा ठरवून तो पार झाल्यावरच विश्रांती साठी थांबत होतो. ह्या स्ट्रॅटेजिने आतापर्यन्त आम्ही १८ किलोमीटरच अंतर पूर्ण केल होत. जस जसे उंची गाठत होतो तस तशी थंडी वाढत होती, सूर्यनारायण सुद्धा मावळला होता. हाताची बोटे गारठली होती, आणि तेव्हा जॅकेटची आठवण झाली, पण जॅकेट तर बॅगेत होते आणि बॅग पिट्टू (हमाल) पुढे घेऊन गेला होता. पिट्टूला कॉल करून जिते असशील तिथे थांबायला सांगितले पण त्याने बरेच अंतर पार केल होत. सांगितल्या प्रमाणे तो थांबून राहिला. काही वेळांनी आम्हाला प्रज्वल खेचरावरून जाताना दिसला (त्याच्याकरिता हा योग्य निर्णय होता). अंदाजे आम्ही रात्री ८:३० च्या दरम्यान छोटी लींचोली येथे पोहचलो, तेथील एका स्टॉल वर चहा घेतला आणि पुन्हा पिट्टूला कॉल केला आणि त्याला त्याचे लोकेशन विचारले. त्याने विद्युत पोल क्रमांक ४०९ कडे यायला  सांगितलं आम्ही विद्युत पोल क्रमांक ३९८ जवळ असल्या कारणाने, जास्त दूर नाही असे वाटत होते.

    चहा पिऊन पुन्हा तरतरी व उर्जित होऊन निघालो पोल क्रमांक ४०९ च्या दिशेने, थंड वाऱ्याची छोटीशी झुळूक पण असह्य होती, कधी एकदा पिट्टू भेटतो आणि जॅकेट घेतो असे झाले होते. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्या मुळे अजूनच काळजी पूर्वक चालावे लागत होते. वेळोवेळी अमेय आणि विजयला फोन लावून त्यांचे लोकेशन जाणून घेत होतो. अंदाजे तासाभराने ९:३० च्या दरम्यान आम्ही पोल क्रमांक ४०९ कडे पोहचलो आणि पिट्टूला भेटलो. सर्वात पहिले बॅगेतून जॅकेट काढले आणि अंगावर चडवले आणि मंदिराच्या दिशेने चालू लागलो. काही अंतर पुढे आल्यावर, तहान लागली म्हणून पाण्याची बाटली शोधू लागलो. हातात बाटली नव्हती, जॅकेट बॅगेतून काढण्याच्या नादात तिथेच विसरलो होतो. ह्या पाण्याच्या बाटलीची एक विशेष आठवण म्हणजे, नाशिकला मित्र वैभव सोबत फिरायला गेलो असते वेळी, चहाच्या टपरीवर हीच पाण्याची बाटली विसरलो होतो, मित्राने ती आणण्याकरिता ,गाडी  ३ किलोमीटर मागे घेतली होतीटीप : जेव्हापण आपली बॅग दुसऱ्याकडे द्याल, तेव्हा महत्वाच्या वस्तू जसे की औषधे, रेनकोट, गरम कपडे आपल्या जवळ काडून घ्या, नाही तर फजिती होईल जसी माझी झाली 😅. पिट्टूवाल्याच्या चालण्याच्या वेगाला जुळवणे आमच्या साठी कठीण जात होते. वाटेत आम्हाला राहुल नायर आणि प्रदीप सिंगोदीया भेटले. राहुलला आमच्या पुढे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला, राहुलचे अंदाजे वजन १०० किलो पेक्षा जास्त असावे आणि त्याच्या पाठीवरील बॅग १०-१२ किल वजनाची असावी एवढे वजन घेऊन तो ट्रेक करत होता! सलाम त्याच्या क्षमतेला आणि इच्छाशक्तीला 🫡 याच्याहून मोठा पराक्रम त्याने तुंगनाथ ट्रेकला केला, तो पुढे तुंगनाथ प्रवासवर्णाना वेळे सांगेनच. बराच उशीर झाला होता, पिट्टूच्या सोबतीने चालताना दमछाक होत होती, तो मात्र आमच्या बॅगा घेऊन भरा भरा चालत होता. खेचरांच्या पागेजवळ (पोनी कॅम्प) आम्ही पुन्हा विश्रांती साठी थांबलो, पिट्टूला मात्र आम्ही पुढे जाऊ दिले त्याला थांबवले नाही. पोनी कॅम्प जवळील एका फलकावर लिहिले होते, केदारनाथ मंदिर १.५ किलोमीटर. वाचून मनाला थोडा दिलासा मिळाला. पुन्हा चालायला सुरवात केली जेमतेम ५०० मीटर पुढे आल्यावर पुन्हा एक मैलाचा दगड दिसला त्यावर पन केदारनाथ मंदिर १.५ किलोमीटर लिहलेल पहिल आणि कळल कि आपल्या सोबत स्कॅम झालाय 😅.
     
    शेवटची ४-५ किलोमीटर काही संपेनात, मंदिराचे शिखर दिसत होते पण रस्ता काही संपत नव्हता. चिकित्सालयाजवळ कौशल पुन्हा विश्रांती साठी बसला, यावेळी तो फार दमला होता. "थोडेच अंतर बाकी आहे, चल उठ" पण कौशल काही उठायला तयार नाही. अखेर कौशलने मला पुढेजाऊन पिट्टूला मोकळे करायला सांगितले. नाईलाजास्तव कौशलला मागे सोडले आणि पुढे जाऊन पिट्टूला गाठले. अखेरीस रात्री ११:३० वाजता मी लॉज वर पोहोचलो, पिट्टूला त्याचे पैसे दिले आणि मोकळे केले. पाठोपाठ कौशलही येत होता, त्याची भेट राहुलशी झाली, राहुलने त्याला उमेद दिली व मदद करून पुढे आणले. अश्या प्रकारे एक एक करून कौशल, अमेय, विजय, राहुल, प्रदीप लॉज वर पोहचले. १८ सदस्यांपैकी मागे राहिले होते एकूण ६ जण, त्यातील २ जण रात्री १२:३० च्या दरम्यान पोहचले पण ४ सदस्य यायचे बाकी होते ते लवकरच पोहचतील या आशेत सर्वजण होते. समूहातील ४ जण सोडले तर बाकी सर्वजण लॉज वर आराम करत होते. विजयने सर्वांना सूचित केले होते कि रात्री १ वाजता महादेवाच्या अभिषेकला जायचे आहे, पण मला काही थार होईना. अंदाजे रात्री १२:१५ च्या दरम्यान मी विजयला सांगून निघालो मंदिर पाहायला, सोबत समूहातील सदस्य जोत्स्ना सुद्धा आल्या. आई वडिलांना आणता आले नाही याची खंत होती, ती कमी करण्या करीत विडिओ कॉल द्वारे आई वडिलांना दर्शन घडवले. रात्री दिव्यांच्या रोषणाईत मंदिर पाहण्याची मजा औरच. महत्वाचे म्हणजे मंदिराच्या मागिलबाजूस असणाऱ्या पांढऱ्या शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा रात्रीच्या अंधारात गुडूप झाल्या होत्या. मंदिराचे छान छान फोटो काढले आणि आम्ही लॉज वर परतलो, इतक्यात विजय ने सांगितले अभिषेकासाठी निघायचे आहे. रात्री १:३० वाजता आम्ही पुन्हा मंदिराजवळ आलो आणि अभिषेकाच्या रांगेत उभे राहिलो. यावेळी आमच्या समूहात आणखीन ४ सदस्य शामिल झाले, जे हेलिकॉप्टरने केदारनाथला आले होते.

श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत
श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत 
श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत
श्री केदारनाथ मंदिर, रात्री दिव्यांच्या रोषणाईत 

    अखेर तो क्षण आला! अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात आम्ही मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराने नतमस्तक होत आत प्रवेश केला. मंदिराच्या सभामंडपात श्री कृष्ण व पांडवांच्या मुर्त्या आहेत (द्रौपदी, भीम, अर्जुन, युधिष्टिर). मूर्त्यांना तुपाचा लेप चढवलेला होता. सभामंडपाच्या छताच्या मध्यभागी सुंदर नक्षीदार दगडी कमळ कोरले आहे आहे आणि त्याला जोडून मोठा झुंबर लावला आहे. झुंबराच्या खाली नंदीमहाराज विराजमान आहे व त्याच्या बाजूला खंडित झालेले अमलक (मंदिराचे शिखर व कळस यांच्या मध्ये असणारी दगडी चक्र) ठेवले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्याकडे (आतील बाजूस) श्री लक्ष्मी नारायण यांची मूर्ती ठेवली आहे, मुर्त्या पाहून कळते कि या एकविसाव्या दशकातल्या आहेत. अंतराळाच्या द्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. आम्ही अंतराळात पोहचलो (सभामंडप व गर्भगृहाच्या मधील जागा), गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. नतमस्तक होत गर्भगृहात प्रवेश केला आणि केदारनाथ बाबाचे दर्शन झाले. गर्भगृहाच्या भिंती सोन्याच्या पत्र्यांनी सजवलेल्या आहेत व शिवलिंगाच्या चारही बाजू चांदीच्या पत्र्याने सजवलेल्या आहेत. शिवलिंगावर जलाभिषेक केला, दर्शन घेतले आणि मंदिरातून बाहेर आलो. (विशेष म्हणजे, जलाभिषेक केले केलेले, बाहेर जाण्याकरिता जागा व प्रणाला दिसले नाही, आम्ही गर्भगृहात पूर्ण प्रदक्षिणा करून बाहेर पडलो होतो, इत्तर शिवमंदिरात पूर्ण प्रदक्षिणा केली जात नाही).

    भारतातील बहुतांश मंदिरे ही पूर्वाभिमुख आहेत व शिवलिंगावरील केलेले जलाभिषेकाचे जल मंदिराच्या दक्षिणेस प्राणालाद्वारे उदक कुंडात जमा होते. पण केदारनाथ मंदिर दक्षिणाभिमुख आहे व शिवलिंगावरील केलेले जलाभिषेकाचे जल दक्षिणेस, पण मंदिराच्या मागच्या बाजूस बाहेर पडून उदक कुंडात जमा होते. केदारनाथ मंदिर हे नागर शैलीत बनवलेले असून, दगड जोडण्या करिता इंटर लॉकिंग पद्धतीचा वापर केला गेला आहे ज्यात दोन दगड लोखंडी क्लॅम्प द्वारे जोडले जातात. केदारनाथ मंदिराच्या बाहेर पुरातन दगडी नंदी आहे, या शिवाय सभामंडपात पण छोटा दगडी नंदी स्थापित केलेला आहे, कदाचित बाहेरील पुरातन दगडी नंदी खंडित झाला असावा म्हणून सभामंडपात नवीन दगडी नंदी स्थापित केल्याची शक्यता आहे.

श्री केदारनाथ मंदिराचे शिखर
श्री केदारनाथ मंदिराचे शिखर
श्री केदारनाथ मंदिर - सभामंडपातील झुंबर
श्री केदारनाथ मंदिर - सभामंडपातील झुंबर

    मंदिरा मागील भीम शिळा पाहायला जात असते वेळी पावसाला सुरवात झाली आणि आम्ही सर्वजण पळत लॉज वर आलो. पायाच्या दुखण्यामुळे अमेयच्या आईला चालणे कठीण जात होते त्यामुळे पूर्ण कुटुंब मागे राहील होत, हे ध्यानातच आले नाही. अंधारात लॉज कडे जाणारा रस्ता कोणता हे कळत नव्हते, म्हणून अमेयने फोने केला असता, एक जास्तीचा रेनकोट घेऊन खाली उतरलो व सर्वांना लॉजवर घेऊन आलो. या वेळी उर्वरित ४ सदस्यांपैकी २ सदस्य पोहचले होते व दर्शनाकरीत गेले होते. पावसाला सुरुवात झाली असल्या कारणाने उर्वरित दोन सदस्यांनी सर्वांचीच काळजी वाढवली होती. अंदाजे रात्री २:३० च्या दरम्यान दोघेही लॉज जवळ पोहचले, पुन्हा खाली उतरून त्यांना लॉजवर घेऊन आलो. आता मात्र भूक लागल्याचे जाणवले, पण लॉज वर आणलेले जेवण थंड गार झाले होते. समूहातील सदस्य निशिकांत थाली यांनी पुरणपोळी व ठेपले आणले होते, ते खाऊन पोटाला आधार दिला. पुरणपोळी व ठेपल्यांकरिता निशिकांत थाली यांचे खुप खुप आभार! सकाळचा ७ चा गजर लावून, पुन्हा मंदिर पाहण्याची उत्सुकता पोटी बाळगून झोपी गेलो. 👉 पृष्ठाच्या सुरुवातीला जा


दिवस चौथा


    सकाळी सातचा गजर झाला, थकवा फार असल्या कारणाने उठायला काही होईना. अखेरीस ७:३० च्या दरम्यान उठलो आणि फ्रेश झालो. कडाक्याची थंडी असल्या कारणाने अंघोळ करायची हिम्मत काही होईना. गरम पाणी होते पण ते फक्त वॉश बेसिनच्या नळाला, शॉवर मध्ये फक्त ५ मिनिटेच गरम पाणी येत होते 😄. विजयने सुद्धा अंघोळ न करण्याचा निर्णय घेतला त्याच्या पाठोपाठ सर्वांनीच या निर्णयाचे अनुसरण केले 😅.  लॉजच्या खोली बाहेर आलो असता, समोरच हिरव्यागार पर्वतातून धबधबा कोसळताना पाहून "व्वाव" हे उद्गार तोंडी आले, इतक्या राहुल नायर याने मला थोडे पुढे येऊन उजवीकडे पाहायला सांगितले. सफेद शुभ्र हिमालयाच्या पर्वत रांगा पाहून "व्वाव" हे उद्गार "बिव्हटिफूल" मध्ये बदलले. अंदाजे सकाळी ८:३० वाजता आम्ही सर्वजण मंदिराजवळ पोहोचलो. केदारनाथ मंदिर आणि त्याच्या मागील हिमालयाच्या पर्वत रांगा, हे सुंदर दृश्य पाहताच राहाव असे वाटत होते. पुन्हा एकदा घरच्यांना व मित्रांना विडिओ कॉल केला. आदल्या रात्री उशिराने आलेले २ सदस्यांना विशेष पास द्वारे विजयने त्यांना दर्शना करिता पाठविले. ग्रुप फोटो व सेल्फी काढले आणि १ किलोमीटर चढाई करून भैरवनाथ मंदिराकडे पोहचलो. 

श्री केदारनाथ मंदिर
श्री केदारनाथ मंदिर
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो - डावीकडून उजवीकडे
खाली बसलेले सदस्य - अमेय, विजय, जोत्स्ना, अभिषेकची पत्नी.
उभे सदस्य - अभिषेक, कौशल, राहुल, प्रज्वल, निशिकांत, प्रदीप, मी, अमेयचे वडील व आई, स्नेहालची आई.

    भैरवनाथ म्हणजे या जागेचा रक्षण करणारा क्षेत्रपाल. (कांतारा चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये गावाच्या रक्षणा करिता क्षेत्रपाल प्रकट होताना दाखवले आहे तसेच काहीसे). भैरवनाथाचे दर्शन घेऊन आम्ही सर्व जवळील एका टेकडीवर जाऊन फोटो काढू लागलो. मनोसोक्त फोटो काढल्या वर मी आणि कौशल मंदिराजवळ आलो, मुख्य मंदिराच्या शेजारील अजून एक छोटे मंदिर आहे. हे मंदिर कोणाचे आहे हे पुजाऱ्याने सांगितले होते पण ते आता मला ज्ञात नाही. तेथून आम्ही दोघे भीम शिळा पाहण्याकरिता जात असताना प्रज्वलशी भेट झाली. त्यांनी आम्हाला सांगितले कि सर्वांनी भैरवनाथाच्या पायथ्याशी असणाऱ्या भंडाऱ्यात नाश्ता/जेवण केले, तुम्ही ही जाऊन या. सकाळी नाश्ता केला नव्हता, मग काय भीम शिळेकडे न जाता मागे वळलो आणि "बर्फानी सेवा समितीचा - अलवर भंडाऱ्यातील" प्रसाद ग्रहण करून सकाळचा नाश्ता केला आणि निघालो भीम शिळेच्या दिशेने. 

भैरवनाथ मंदिर
भैरवनाथ मंदिर
भैरवनाथ मंदिरातील देवांची शिल्पे
भैरवनाथ मंदिरातील देवांची शिल्पे

    भीम शिळा! १६ जून २०१३ मधील प्राकृतिक आपदेवेळी मंदिराच्या मागील बाजूस एक मोठी शिळा चमत्कारी रित्या येऊन थांबली व मंदिराचे रक्षण झाले. ढगफुटीमुळे हिमनदीतून (ग्लेशियर) येणारा पाण्याचा व दगडांचा प्रवाह या भीम शिळे मुळे दुभाजित झाला व मंदिराचे रक्षण झाले. (देवावर विश्वास न ठेवणाऱ्यासाठी दैवी चमत्काराचे उदाहरण!). भीम शिळेचे फोटो काढले आणि निघालो जगदगुरु आदी शंकराचार्य यांच्या समाधी स्थळाकडे. मंदिरापासून २०० ते ३०० मीटर अंतरावरील हे समाधी स्थळ आहे. आदी शंकराचार्य यांनी केदारनाथ मंदिराच्या मागिलबाजूस समाधी घेतली असे मानले जाते. समाधीचे दर्शन घेतले आणि आम्ही दोघे निघालो लॉजच्या दिशेने, केदारनाथ मंदिराच्या समोर आलो आणि शेवटचा नमस्कार केला, पुन्हा कधी एयायला मिळेल ठाऊक नाही. डोळे पाणावले होते, स्वतःला आवरले आणि लॉजवर पोहचलो. सामानाची आवराआवर केली आणि आम्ही सर्व परतीच्या प्रवासाकरिता लॉज मधून बाहेर पडलो, जवळील एका रेस्टऑरेंत मध्ये नाश्ता केला. अमेयच्या आई वडिलांना पालखी करून देण्या करिता विजय, अमेय सोबत थांबला होता. 

श्री केदारनाथ मंदिरामागील - भीम शिळा
आदी शंकराचार्य समाधी स्मारक
आदी शंकराचार्य समाधी स्मारक 

    अंदाजे दुपारी १२:१५ ला मी आणि कौशल पुढे निघून उतरायला सुरवात केली. या वेळी मात्र आम्ही आमच्या बॅगा पिट्टू (हमाल) कडे दिल्या नाहीत. बऱ्या पैकी वेगाने आम्ही दोघे खाली उतरत होते, बॅगा जड असल्याने विश्रांती साठी वेळोवेळी थांबत होतो. उतरतेवेळी उजव्या पायाच्या बोटांना इजा झाल्याचे जाणवले, बोटांना फोड आल्याचा अंदाज होता, पण बुटे काडून पाहत बसलो तर वेळ वाया जाईल म्हणून तसाच चालत राहिलो. अवघ्या २ तासात आम्ही छोटी लींचोलीच्या पुढे पोहचलो. काही अंतर पुढे आल्यावर अचानक माझे दोन्ही पाय घसरले आणि धडाम कण पडलो 😐. नशीब बलवत्तर बॅग मोठी असल्या कारणाने बॅगेवर आपटलो, नाहीतर ढुंगणाचा खुर्दा झाला असता 😅. तेथील एका यात्रेकरूने मला उठायला मदद केली. कौशल फोन वर असल्या कारणाने याबद्द त्याला काहीच कल्पना नव्हती. मंदाकिनी नदीवरील पूल ओलांडण्या आधी आम्ही जेवायचा निर्णय घेतला, व तेथील एका ढाब्यामध्ये जाऊन बसलो. पराठ्याची ऑर्डर दिली होती, वाट पाहत असतानाच पावसाला जोरदार सुरुवात झाली. आमच्या कडे रेनकोट होते, तरीपण थोडे फार भिजायला होणार याची कल्पना होती. या थंड वातावरणात भिजल्याने तब्बेत बिघडण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं पाऊसाचा जोर मंदावण्याची वाट पाहत बसलो होतो. इतक्या समूहातील सदस्य प्रसाद मुंडे याच्याशी भेट झाली. जवळ जवळ ४० मिनिटे प्रतिक्षे नंतर पावसाचा जोर मंदावला व आम्ही निघायचा निर्णय घेतला. कौशल, प्रसाद आणि मी आम्ही तिघई रेनकोट घालून निघालो व नथांबत चालत राहिलो, तासाभरात आम्ही जंगल छत्ती जवळ पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेतली आणि नंतर विश्रांती साठी थांबलो ते थेट भैरवनाथ मंदिराजवळ. अंदाजे सायंकाळी ६ वाजता आम्ही गौरीकुंडच्या प्रवेश कमानी जवळ पोहचलो. तेथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती असलेल्या छोटे लाकडी मंदिरे खरेदी केले आणि निघालो गौरीकुंडच्या दिशेने. अंदाजे सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान आम्ही खाली पोहचलो (केदारनाथ मंदिर ते गौरीकुंड, खाली उतरायला आम्हाला ६:३० तास लागले)

    अमेयला फोन केला असता त्याने सांगितले की तो स्वतः, विजय व जोत्स्ना ३ किलोमीटर दूर आहेत, म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत थांबलो. त्या वेळेत आम्ही नाश्ता करून घेतला. नाश्ता करून झाल्यावर, ते सर्व कुठवर पोहचले आहेत याचा अंदाज घेण्या करीत अमेयला पुन्हा फोने केला, अमेयने सांगितलेकी तो अजून ३ किलोमीटर दूर आहे. एवढा वेळ झाला तरीपण तुम्ही ३ किलोमीटर दूर? असा प्रश्न विचारला असता, अमेयने किलोमीटर स्कॅमची आठवण करून दिली 😅. त्याचवेळी विजयने कौशलला फोन केला होता, म्हणून अमेयला सांगितले कि कौशल आणि प्रसाद माझ्यासोबत आहेत; हे ऐकून अमेय आणि विजयने सुटकेचा श्वास सोडला. प्रसाद माझ्या सोबत आहे याची त्यांना कल्पना नव्हती.अमेय व विजयला, प्रसाद न सांगता पुढे निघून आला होता. पण विजय व अमेयला वाटत होते की प्रसाद अजून मागेच आहे,  म्हणून प्रसादाची प्रतीक्षा करण्यात त्यांचा वेळ वाया जात होता. विजयने आम्हाला पुढे जाण्यास सांगितले, कारण गौरीकुंड ते सोनप्रयाग शटल साठी मोठी रांग होती, तसेच समूहातील पुढे गेलेले ३ सदस्य सोनप्रयागला प्रतीक्षेत बसले होते. प्रत्येक ६ सदस्यांकरिता एक गाडी असल्या कारणाने एकूण ६ सदस्य झाल्या शिवाय गाडी निघणे शक्य नव्हते. आम्ही शटल करिता रांगेत उभे राहिलो,  अवघ्या ३० मिनिटात आमचा नंबर आला आणि आम्ही शीतलने (जीप) सोनप्रयागला पोहचलो. सोनप्रयाग टॅक्सी स्टॅन्ड पासून आम्हाला अजून १ ते १.५ किलोमीटर पुढे चालत जायचे होते. 

    सोनप्रयाग पार्किंग एरिया जवळ पोलिसांनी लावलेले बॅरिकेड ओलांडून पुढे गेलो असता, प्रसाद मुंडे गुडूप झाला, त्याचा फोन त्याच्या जवळ नसल्याने त्याला शोधणे अजून अवघड झाले होते. तेथे दोन रस्ते असल्या कारणाने हा नक्की कोणत्या रस्त्याने पुढे गेला हे कळेना व आम्ही दोघे (कौशल आणि मी) नक्की योग्य रस्त्यावर चालत आहोत कि नाही हे ही कळेना. प्रसादची पत्नी (प्रणालीला) फोने करून विचारले असता, तो अजून पोहचला नसल्याचे कळले आणि आमची चिंता अजून वाढली. तेथील एका दुकानदाराला चंद्रपुरीला जाणारा रास्ता हाच का? विचारले असता, त्याने हा एकाच रास्ता चंद्रपुरीला जातो असे सांगितले. पुढे जाऊन विश्रांती करिता थांबलेलो असताना अचानक दूरहून आवाज आला, तो प्रसादच होता. साहेबांची भेट झाली आणि आम्ही निर्धास्त झालो. अंदाजे रात्री ९:३५ च्या दरम्यान आम्ही इतर ३ सदस्यांना भेटलो आणि गाडीने चंद्रपूरच्या दिशेने निघालो. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी दरड पडल्या असल्या कारणाने ट्राफिक जॅम झाले होते. तासाभराच्या रस्त्याला आम्हाला दोन तास लागले आणि आम्ही चंद्रपुरीला रात्री ११:५० ला शिखर लॉजवर पोहचलो. 

    लॉज वर पोहचलो खरे पण, ज्या रूम्स २२ तारखेला आम्हाला दिल्या होत्या त्या आता बदलल्या होत्या, त्यामुळं थोडा गोंधळ उधाला होता. विजयला फोने करून विचारले असता त्याने गौरव नेगीला विचार असे सांगितले आणि त्याच वेळी त्याने मला एक चिंताजनक माहिती सांगितली. त्याच्या सोबत असणाऱ्या सदस्यांना पैकी एक सदस्य रस्ता चुकला होता व त्याचा फोन त्याच्या जवळ नसल्याने त्याला शोधणे अवघड जात होते. अखेर १ तासानंतर ती व्यक्त सापडली, विजय आणि इतर ५ सदस्य रात्री २:३० ला लॉज वर पोहचले. वरील सांगितल्या प्रमाणे, उतरतेवेळी पायाला इजा झाल्याचे जाणवत होते. बूट काडून पहिले असता, अंदाज खरा ठरला होता, बोटांना फोड आले होते. शैलेश दादाला सायंकाळीच फोन लावून विचारे असता, त्याने सुरवातीला चार शब्द ऐकवले, कारण त्याने कॅन्डीड अँटी फुंगल पावडर आधीच पायाला लावायला सांगितली होती आणि ते मी करायला विसरलो होतो. दादाने पावडर लावून ठेवायला सांगितल्या प्रमाणे, पाय स्वच धुवून व सुकवून फोड आलेल्या जागी पावडर लावून ठेवली. तुंगनाथच्या ट्रेकला चालत येईल कि नाही याची शाश्वती नव्हती, आता ते सकाळी उठल्यावरच कळणार होते.

    प्रवासाच्या योजनेनुसार आम्ही रात्री चोपटाला टेन्ट मध्ये राहणार होतो, पण अचानक आलेल्या पावसामुळे पर्यटकांची गैरसोय होऊनये म्हणून ऑर्गनाईझर विजय सुतार व उत्तराखंडातील ऑर्गनाईझर गौरव नेगी यांनी सर्वांना लॉज वर थांबवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी योग्य निरणाऱ्य घेण्या करिता दोघांचेही खुप खूप आभार. 

    अशाप्रकारे आमचा केदारनाथ ट्रेक व दर्शन पूर्ण झाले आणि आम्ही तुंगनाथ ट्रेक साठी सज्ज झालो.

खर्चाचा तपशील



वेळेचा तपशील